
या लोकदरबारात पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे, तसेच एमएमआरडीए (MMRDA) अंतर्गत येणाऱ्या विकासकामांबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या. विशेषतः मेट्रो, रस्ते विकास, तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मात्र, या सर्व तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी उपस्थित राहणे अपेक्षित असलेले MMRDA चे संबंधित अधिकारी लोकदरबारात अनुपस्थित असल्याचे समोर आले. यामुळे मंत्री प्रताप सरनाईक यांचा संताप अनावर झाला.
एका नागरिकाने एमएमआरडीए संदर्भातील गंभीर तक्रार मांडताच सरनाईक यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. फोनवरून त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत अत्यंत कडक शब्दांत सुनावले . “तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी आहे का? लोकांची कामं प्रलंबित आहेत आणि तुम्ही लोकदरबारातही हजर राहत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.”
सरनाईक यांनी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना तात्काळ लोकदरबाराच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
या घटनेनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही वेळातच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी हजर राहण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.लोकदरबारादरम्यान मंत्री सरनाईक यांनी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनाही स्पष्ट सूचना दिल्या की, नागरिकांच्या समस्या सोडवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक तक्रारीवर वेळेत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या कडक भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी सरनाईक यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, अशा लोकाभिमुख उपक्रमांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले. दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरातील प्रलंबित विकासकामे, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि एमएमआरडीएशी संबंधित प्रकल्पांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील काळात अधिकारी वर्ग अधिक सजगपणे काम करेल का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.