
MLA Sunil Shelke on NCP Unification NCP Maharashtra Politics
Maharashtra Politics : मावळ : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या राजकीय नेत्यांची धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांचा समावेश आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि नरहरी झिरवाळ हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामुळे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या स्थितीवर भाष्य केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही असे वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला.
दिवंगत नेते अजित पवार यांचे जानेवारी महिन्यामध्ये निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र याबाबत केवळ चर्चा झाल्या कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा आणि पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. मात्र पक्षातील नेत्यांचे कारनामे समोर येऊ लागल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचे देखील आता वय झाले असून त्यांना खासदारकीचा अर्ज देखील भरायला स्वतः जाते आले नाही. या राजकीय पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा वाढली आहे. याबाबत दोन्ही गटातील नेते वक्तव्य करत आहेत.
हे देखील वाचा : अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही असे सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, आनंद आहे, कामकाज करत असताना दादांची उणीव भासत आहे. दादांचंअपघाती निधन झालं. त्यांनतर शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी चर्चा झाली सांगितलं. दादांसोबत भेट झाली सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा. ती भूमिका वरिष्ठ नेत्यांनी पार पाडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील, तर आनंद आहे,” अशा भावना आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया
पुढे ते म्हणाले की, “दोन्ही पक्ष एकत्र आले तर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा होईल. व्यक्तिगत स्वार्थ असलेला विरोध करेल,सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य असेल तर एकसंघ होतील. नेतृत्व मान्य नसेल तर दुसर्या पक्षाचा पर्याय शोधला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित दादांच्या अपघातच सत्य सर्वांसमोर आणतील,” असे देखील मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले आहे.