
मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी
प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यानंतर काँग्रेसचेच असलम शेख ८०.५८ गुणांसह दुसऱ्या, तर ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, मूल्यांकन करण्यात आलेल्या मुंबईतील ३३ आमदारांपैकी केवळ या तीन आमदारांनाच ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
अहवालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे आमदारांकडून विधिमंडळात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या गुणवत्तेत झालेली घसरण. १२व्या विधानसभेत प्रश्नांच्या गुणवत्तेचा सरासरी स्कोअर ५० टक्के होता. तो १५व्या विधानसभेत अवघ्या ३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यावरून मुंबईच्या प्रश्नांबाबत विधिमंडळात होणाऱ्या चर्चेची गुणवत्ता आणि आमदारांकडून उपस्थित केले जाणारे मुद्दे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
केवळ प्रश्नांची गुणवत्ताच नव्हे, तर आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. १५व्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत मुंबईतील ३३ आमदारांनी एकूण २,२१३ प्रश्न विचारले. याउलट, १२व्या विधानसभेतील हिवाळी अधिवेशन २००९ ते पावसाळी अधिवेशन २०१० या समान कालावधीत ७,९५५ प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच प्रश्नांच्या संख्येत सुमारे ७२ टक्के घट झाली आहे.
मुंबईतील ३३ आमदारांचा १५व्या विधानसभेतील एकूण सरासरी स्कोअर ५५ इतका आहे. १२व्या विधानसभेत हाच सरासरी स्कोअर ६१ होता. त्यानंतर १४व्या विधानसभेत तो ५४ पर्यंत घसरला होता. १५व्या विधानसभेत तो ५५ वर पोहोचल्याने किरकोळ सुधारणा दिसून आली असली, तरी १२व्या विधानसभेच्या तुलनेत कामगिरी अजूनही कमी आहे.
अहवालातून आणखी एक महत्त्वाचा कल समोर आला असून गेल्या काही विधानसभांमध्ये मुंबईतील आमदारांचे सरासरी वय वाढताना दिसत आहे.
१२वी विधानसभा – ५२ वर्षे
१३वी विधानसभा – ५१ वर्षे
१४वी विधानसभा – ५३ वर्षे
१५वी विधानसभा – ५७ वर्षे
त्यामुळे सध्याच्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांचे सरासरी वय गेल्या चार विधानसभांमधील सर्वाधिक असल्याचे या आकडेवारीवरून दिसते.
प्रजा फाउंडेशनने आमदारांची क्रमवारी ठरवताना केवळ त्यांनी किती प्रश्न विचारले एवढाच निकष विचारात घेतलेला नाही. प्रश्नांची संख्या आणि गुणवत्ता, विधिमंडळाच्या कामकाजातील सहभाग, उपस्थिती तसेच इतर कामगिरीविषयक निकषांचा समावेश करून एकूण गुण निश्चित करण्यात आले आहेत.
एकूणच, ‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, असलम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी आघाडी घेतली असली, तरी मुंबईतील आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या ७२ टक्क्यांनी घटणे आणि प्रश्नांच्या गुणवत्तेचा सरासरी स्कोअर ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत घसरणे, या बाबी विधिमंडळातील मुंबईच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.
‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’मध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांनी पहिले तीन क्रमांक पटकावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दोन आमदारांनी टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचे सुनील प्रभू चौथ्या क्रमांकावर, तर भायखळा विधानसभा मतदारसंघाचे मनोज जामसुतकर पाचव्या क्रमांकावर आहेत. वरळीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे १८व्या स्थानावर आहेत.
दुसरीकडे, रिपोर्ट कार्डच्या तळाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार दिसत आहेत. प्रकाश सुर्वे ३३व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर, तर शिवसेनेचे अशोक पाटील ३२व्या क्रमांकावर आहेत. घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम ३१व्या स्थानावर आहेत.
‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा