
मेहता म्हणाले, “सरनाईक यांनी मिरा-भाईंदरमध्ये माझ्या 30 टक्के जागा असल्याचा आरोप केला. जर एवढी संपत्ती माझ्याकडे असती, तर तिची किंमत २ लाख कोटींहून अधिक झाली असती. एवढे पैसे असते तर मी सरनाईक यांनाच कामावर ठेवले असते.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.याचबरोबर, पूर्वेश यांनी पाठवलेल्या पत्राला आपण उत्तर देणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. मात्र, पूर्वेश यांनी काहीही चुकीचे बोलले नसल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदनही केले.संस्कारांबाबत टीका करताना मेहता यांनी सरनाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “जी शिकवण ते आज देत आहेत, ती आधी आपल्या वडिलांना दिली असती, तर आजची वेळ आली नसती,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. तसेच, कोणतेही वक्तव्य करताना जबाबदारीने आणि पुराव्यांसह बोलावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देताना, “सरनाईक यांच्या वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत,” असे स्पष्ट केले.दरम्यान, लोकदरबारात सेव्हन इलेव्हन कंपनीबाबत झालेले आरोप ‘प्लॅन्टेड’ असल्याचा दावा करत मेहता यांनी हे सर्व राजकीय डाव असल्याचे सांगितले.एकूणच, मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस ढवळून निघत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिक मात्र या आरोप-प्रत्यारोपांमुळे विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत आहेत.