
केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान; म्हणाले, 'राहुल गांधी विद्यार्थ्यांचा घेत आहेत गैरफायदा, केवळ राग...'
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सध्या विद्यार्थी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही विविध वक्तव्ये केली जात आहेत. त्यात आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची गरज आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत’.
दिल्लीसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांमधील संताप टोकाला गेला आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेत आहेत. सरकारच्या जबाबदारीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “केवळ राग व्यक्त करण्यापेक्षा तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक काहीतरी करण्याची गरज आहे.” सध्या सीजेपी आणि काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांचे नेते आणि स्पर्धा परीक्षेचे उमेदवार दिल्लीत रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळही आंदोलन करण्यात आले.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “आमचे सरकार नीटवर चर्चा करण्यासाठी आणि सभागृहात आमच्या तरुणांच्या प्रत्येक खऱ्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी १००% कटिबद्ध आहे. भारतातील विद्यार्थी राजकीय प्रचारातील प्यादी बनण्यापेक्षा खूप चांगल्या वागणुकीस पात्र आहेत. त्यांना गोंधळाऐवजी निश्चितता, घोषणाबाजीऐवजी उपाय आणि व्यत्ययाऐवजी जबाबदारी मिळायला हवी.”
धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?
सर्वसमावेशक चर्चेसाठी सरकारची तयारी असूनही, काँग्रेसने लोकशाही चर्चेऐवजी दुसरा मार्ग निवडला. विद्यार्थ्यांसाठी उपाय शोधणे हा त्यांचा उद्देश नाही, तर राजकीय व्यत्यय निर्माण करणे हा आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या हितासाठी बोलत नाहीत. चर्चेची खरी संधी असूनही ते संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काँग्रेस आणि सीजेपीच्या मागण्या काय?
नीट पेपरफुटी आणि शिक्षण सुधारणांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेले आंदोलन मंगळवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास संपले. प्रधान यांचा राजीनामा ही काँग्रेस आणि सीजेपी या दोघांच्याही प्रमुख मागण्यांपैकी एक आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.