
रामदास आठवलेंसह विनोद तावडेंनाही राज्यसभेत संधी? पार्थ पवारांचा मार्ग सुकर
मुंबई : महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांवर लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार, अनेक पक्षांकडून तयारीही सुरु केली आहे. असे असताना आता भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. भाजपची नामांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जाते. भाजप राज्यसभेसाठी चार उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. यापैकी एका जागेसाठी रामदास आठवले हे जवळपास निश्चित उमेदवार मानले जातात.
रामदास आठवले हे सध्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यात उर्वरित तीन जागांसाठी तीव्र स्पर्धा आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघटनात्मक कामात सक्रिय असलेले विनोद तावडे राज्यसभेवर निवडून येतील का यावर बारीक लक्ष आहे. जर तसे झाले तर त्यांचा सक्रिय राजकारणात पुन्हा प्रवेश होऊ शकतो.
हेदेखील वाचा : Rajya Sabaha Election 2026 : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले
दरम्यान, भाजप चार जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना प्रत्येकी एक उमेदवार उभा करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे आणि त्या बारामती पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याच दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यासाठी बैठक होईल. दुसरीकडे, राज्यसभेसाठी शिवसेनेतही जोरदार लॉबिंग सुरू आहे.
महाविकास आघाडीमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच
महाविकास आघाडीतील एका जागेवर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी उघडपणे दावा केला आहे. मात्र, या समीकरणाची गुरुकिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद् पवार यांच्या हातात असल्याचे मानले जाते. सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार, भाजपचे चार उमेदवार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) चा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.