राज्यसभा निवडणुकीमध्ये एका जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर राज्यसभा निवडणूकीवर देखील स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले की, “ही एक ठराविक प्रक्रिया असते. जर एखादी जागा महाविकास आघाडीला मिळणार असेल, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागतो. ही विधानपरिषद आणि राज्यसभेची निवडणूक आहे. तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा केल्याशिवाय कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही. त्या दृष्टीने आमदारांची एकत्रित बैठक होईल,” अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई
पुढे ते म्हणाले की, “राज्यसभा निवडणुकीची तयारी फक्त महाराष्ट्रात नाही, तर देशभर सुरू आहे. देशभरात साधारण ३६ जागा रिक्त होत आहेत. महाराष्ट्रात ७ जागा आहेत. त्यापैकी ६ जागा जिंकण्याइतकं बळ महायुतीकडे आहे. एका जागेवर आम्ही तिघे मिळून निर्णय घेऊ. – काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. प्रत्येक पक्षाचे एक किंवा दोन सदस्य निवृत्त होत असल्यामुळे, प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा, अशी भूमिका मांडतो.मात्र शेवटी जाणार एकच उमेदवार आहे. तो कोण असेल, यावर तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल,” असे देखील राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार निवडणुकीला उभे राहणार आहेत, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता जर “मी अजून एक संधी घेणार आहे” असं म्हणतो, तर त्यावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही तडे किंवा मतभेद नाहीत.सकाळी आंदोलन होतं, आमदारांना कधी कधी पोहोचायला उशीर होतो.आंदोलनात आमचे महेश सावंत उपस्थित होते, ते तुम्ही पाहू शकता,” असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : BJP च्या नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक; कृष्णराज महाडिक, राजेश पांडेंकडे नवी जबाबदारी
त्य़ाचबरोबर राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर राऊत म्हणाले की, “उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अशा विषयांवर चर्चा होऊ शकते.मुंडवा जमीन प्रकरण संपलेलं नाही; मात्र मुख्यमंत्री पाठीशी असल्यामुळे असे विषय दडपले जातात.विरोधकांच्या नेत्यांची मुलं असती, तर तथ्य नसतानाही त्यात ‘मालमसाला’ घालून खटले उभे राहिले असते.सत्ताधारी एकत्र असल्यामुळेच महाराष्ट्रात ‘कायद्यापुढे सर्व समान’ असल्याचं चित्र दिसतं. त्या अहवालाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. अहवाल वाचलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात तो अहवाल आहे, असं ते म्हणतात. तो कधी बाहेर काढणार, हे मला माहिती नाही,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.






