प्राथमिक शाळेत कांदा, बटाटा, लसूण खाण्यास बंदी! संजय राऊतांचा शाळा व्यवस्थापनाला इशारा
मीरा भाईंदर येथील ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळा व्यवस्थापनाने पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, लसूण, बीट आदी कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर बंदी घातली आहे. यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “विद्यार्थ्यांवर असे निर्बंध लादणारे तुम्ही कोण, हे कशाकरता करत आहात. हे कठीण आहे. हे म्हणजे महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. महाराष्ट्राने काय खायचं काय नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?” असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.
Pune Metro Line 3: हिंजवडीकरांची प्रतीक्षा संपणार! पुणे मेट्रो लाईन ३ ची तारीख लवकरच जाहीर होणार
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत संजय राऊत म्हणाले, ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असा तुकाराम महाराजांचा अभंग असताना कुणी काय खावं हे तुम्ही कोण ठरवणार? हे महाराष्ट्रात चालणार नाही. अशा प्रकारच्या शाळा देवेंद्र फडणवीस चालू देतात आणि तो चालवणारा त्यांच्या पक्षातला आमदार आहे, हे दादागिरी आहे तुम्ही काय करत आहात, हे आमच्या महाराष्ट्राचे खाद्य आहे आणि तुम्ही आमच्या खाण्यावरती बंधने लादता. शाळेत आणायचं नाही हे ठरवणारे तुम्ही कोण, तुम्ही पॉलिसी ठरवत आहात का या राज्याची, देवेंद्र फडणवीसजी तुमच्या राज्यात जे चालू आहे ते बरोबर नाही,” असंही संजय राऊत यांनी नमुद केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडनमध्ये मिळणाऱ्या पुरस्काराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अशा पुरस्कारांशी मला माहिती नसते मी भारतीय माणूस आहे पण हाच पुरस्कार काही काळापूर्वी गोव्याचे विजय सरदेसाई यांना दिला होता. भारतासह संसद रत्न पुरस्कार ठिकठिकाणी दिला जातो. ते कधी तोंड उघडत नाही. तो काही सरकारी पुरस्कार नसतो खाजगी संस्था असतात. त्याच्यामुळे या देशांमध्ये हजारो संसद रत्न आहेत त्यांनी कधी तोंड उघडलं नाही. मलाही दोनदा दिला मी स्वीकारला. त्यात पद्धतीने एखाद्या संस्थेने भारतीय नागरिकाला पुरस्कार दिला असेल तर टिका का करायची. लंडन हा विरंगुळा आहे, ते तिकडे हवापालट करायला गेले असतील. सध्या दरे गावातील हवा गरम आहे ऊन फार आहे ” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
पार्थ पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “विरोधी पक्ष बऱ्याच गोष्टी विसरतो महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला विसरायची आजार झाला आहे. जसा की काल अजित दादा पवार यांच्या अपघातावरून आमच्या सुप्रिया सुळे म्हटल्या यापुढे तो विषय काढणार नाही, का नाही काढायचा अजित पवार हे काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हते, कोणाचे वडील असतील कोणाचे पती असतील, पण तेराज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकनेते होते मोठे नेते होते, राज्याचे पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस मोठा नेता संशयास्पद त्याचा मृत्यू होतो, हा कोणाचाही खाजगी आणि कौटुंबिक प्रश्न असू शकत नाही. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांवर आम्ही प्रश्न विचारतो. जेव्हा तुम्ही समाजकारणामध्ये असता राजकारणात असता, तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बाबतीत संशयास्पद काही असेल तर त्या संदर्भात विरोधी पक्षाला आणि नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. हा विषय बंद करून चालणार नाही. असंही त्यांनी सांगितलं.






