
'जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक होईल'; जंतर-मंतरवरून संजय राऊतांचा इशारा, CJP आंदोलनाला पुन्हा पाठिंबा
राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी आंदोलनाचे प्रमुख चेहरा बनलेले अभिजित दिपकेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.” शिवाजी पार्कवरील सभा, तसेच पुणे आणि नागपूरमधील युवकांचा प्रतिसाद पाहता देशभरात या आंदोलनाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले, “जास्त तेल ओताल तर सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या वेळ पडली तर आम्हीही इथे येऊन बसू. आम्ही जेलला किंवा गोळ्यांना घाबरत नाही. देशासाठी प्राण देणाऱ्यांमध्ये आम्हीही आहोत.” दिल्लीतील पोलिस कारवाईवर टीका करत त्यांनी ती घटना लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला.
राऊत यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचे समर्थन करत ही आग देशहिताची आणि राष्ट्रहिताची असल्याचे म्हटले. आंदोलनात देशभरातील युवक सहभागी होत असून त्यांचा आवाज दाबून प्रश्न सुटणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला.
विद्यार्थ्यांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, “ही आपल्या देशाची मुलं आहेत. याच तरुणांनी काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणलं होतं. आज तेच युवक सरकारविरोधात आवाज उठवत आहेत आणि त्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे.” तसेच, विद्यार्थी सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.