mp sanjay raut target cm devendra fadnavis on parbhani violence
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरुन महायुतीमध्ये अनेक नेते नाराज आहेत. यावरुन आता महाविकास आघाडीने त्यांना लक्ष्य केले आहे. तसेच अजित पवार गटातील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून वंचित ठेवल्यामुळे टीका टिप्पणी केली जात आहे. तसेच संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यामुळे महाविकास आघाडीकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून टिकास्त्र डागलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. परभणीमध्ये झालेल्या घटनेवरुन त्यांनी टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “परभणी आणि बीडमधल्या घटना या राज्याला कलंक लावणाऱ्या आहेत. इथल्या भयंकर अपराधांशी संबंधित असलेले लोक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे अशांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं आहे. एकदा जरा बीडला जायला पाहिजे. त्या कुटुंबांचा, माऊलींचा आक्रोश तुमच्या कानांचे पडदे फाडत नसेल तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही निर्दयी आहात,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल (दि.23) परभणीचा दौरा केला होता. राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबाची भेट देखील घेतली. मात्र भाजपने यावरुन निशाणा साधला होता. यावर संजय राऊत म्हणाले की,”राहुल गांधी महाराष्ट्रात आले, मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे बीडचा अपराध देशपातळीवर गेला आणि फडणवीसांची बेअब्रू झाली. राहुल गांधी बीड आणि परभणीत गेले. त्यामुळे तुमचं पित्त का खवळलं? राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचीही हत्याच झाली आहे राहुल गांधी बरोबर बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जायला पाहिजे होतं बीड आणि परभणीमध्ये. तुम्हाला भीती वाटली. राहुल गांधींवर कशाला टीका करता? मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष नेमले आहेत. पण ते येणार नाहीत कारण ते मोदींचे गुलाम आहेत.” अशा गंभीर शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यामुळे संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, “मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात मानवता व माणुसकीचा खून होतो आहे. आम्हाला लाज वाटते की देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले. ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आपण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर करु शकता पण एका खुनाचा संशय ज्यांच्यावर आहे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळातून दूर ठेवत नाही कारण तुमचं जातीचं राजकारण आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा भयंकर झाली आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी, जनतेने, नागरिकांनी काय करायचं? कुठे जायचं? काय बोलायचं? हे सगळं अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ठरवणार का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.