
सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आठ खासदार सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली. या भेटीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादीचा गट महाविकास आघाडीपासून दूर जाणार का, अशा चर्चाही सुरू झाल्या.
मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी स्वतःचं बोलणं झाल्याचं सांगितलं.
संजय राऊत यावेळी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केवळ दोन खासदारांचे प्रश्न न मांडता राष्ट्रवादीच्या सर्व आठ खासदारांचे प्रश्न एकत्रितपणे पंतप्रधानांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेऊन ते पंतप्रधानांसमोर मांडले जाणार आहे. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,” असं त्यांनी सूचित केलं.
या भेटीवरून महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होऊ नये, असंही राऊत म्हणाले. “कोणीही कुठेही जात नाही. कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतील महत्त्वाची घटक असल्याचं सांगितलं. तसेच शरद पवार हे आपले मार्गदर्शक असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं.
महायुतीतील कथित मतभेदांवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिंदे गट आणि अजित पवार गटाबाबत त्यांनी भाजप आणि केंद्रीय नेतृत्वावर जोरदार टीका केली. तसेच आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाच्या राजकीय अस्तित्वाबाबतही त्यांनी दावा केला. सुप्रीम कोर्टातील प्रलंबित प्रकरणाचा संदर्भ देत या गटाला भविष्यात भाजपमध्ये विलीन व्हावं लागू शकतं, असं राऊत म्हणाले.
‘उद्धव ठाकरेंना जळी स्थळी काष्ठी पाषाणी शिंदेच दिसतात’; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
एकूणच, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदींसोबत होणारी भेट ही मतदारसंघातील प्रश्नांसाठी असल्याचं स्पष्टीकरण देत राऊत यांनी महाविकास आघाडीतील संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चांना तूर्तास विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.