
सुषमा अंधारे-जयकुमार गोरे वाद चिघळला; ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, अंधारेंचा बोचरा टोला
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि भाजप नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद आता अधिक चिघळताना दिसत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून, सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या वादाला सुरुवात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत गोरेंवर गंभीर आरोप केले. गोरेंनीही त्याला प्रत्युत्तर देताना अंधारेंचा उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केला होता. आता गोरेंच्या या भूमिकेला सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून जशास तसे उत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या ज्ञान आणि संस्कारांवरही प्रश्न उपस्थित केला. जयकुमार गोरे हे निश्चितपणे ‘कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत’, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या संस्कारांबाबतही शंका असल्याचे अंधारे यांनी म्हटले.
बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
आपल्या पोस्टमध्ये अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गोरेंच्या वर्तनावरही निशाणा साधला. पत्रकार परिषद घेताना थोडे संयमाने वागावे आणि एखाद्या व्यक्तीच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देण्यापूर्वी ती पूर्णपणे ऐकावी, असा सल्ला त्यांनी दिला.
आपल्या पत्रकार परिषदेत आपण वापरलेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला. गोरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या पत्रकार परिषदेत संबंधित आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत. आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे…
जयकुमार, पत्रकार परिषद घेत असताना थोडी कमी पीत चला… आणि हो एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचं असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत… — SushmaTai Andhare (@andharesushama) August 15, 2026
याशिवाय गोरेंच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोपही अंधारेंनी केला. भाजपच्या मंत्र्याकडून अशा भाषेची फार वेगळी अपेक्षा करता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
या वादातील सर्वात बोचरा सवाल करताना अंधारे म्हणाल्या की, जयकुमार गोरे यांनी आधी आपला उल्लेख ‘ज्येष्ठ भगिनी’ असा केला होता. त्यानंतर मात्र टीका करताना वापरलेल्या भाषेवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘तुम्ही तुमच्या मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलता का?’ असा सवाल त्यांनी केला.
सुषमा अंधारे यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या टीकेपासून सुरू झालेला हा वाद आता अंधारे आणि गोरे यांच्यातील थेट शाब्दिक संघर्षात बदलला आहे. अंधारेंच्या ताज्या टीकेला जयकुमार गोरे काय उत्तर देतात आणि हा वाद आणखी किती तीव्र होतो, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.