
जिल्हा बँकेत जाण्याचा शिंदेंचा दरवाजा तूर्तास बंद?
मेढा / दत्तात्रय पवार : जिल्हा बँकेची सोसायटी मतदारसंघातील ठराव प्रक्रिया पूर्ण झाली असून, जावळी तालुक्यातील ४९ पैकी ४८ सोसायटींचे ठराव होऊन मतदार निश्चित झाले आहेत. यामधील तब्बल 32 मतदार आत्तापासूनच बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सहलीवर पाठवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी देखील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा बँकेत जाण्याचा मार्ग खडतरच दिसत आहे.
तालुक्यात ठराव प्रक्रियेदरम्यान ठरवावरून मोठे वादाचे प्रसंग उदभवले होते. दस्तुरखुद्ध मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे ठराव प्रक्रियेत मैदानात उतरल्याने पहिल्या टप्प्यातच ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी अधिकाधिक ठराव घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. हातगेघर येथील ठरावादरम्यान भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राजकीय पंचायत केली होती. अपेक्षित संचालक सोबत असतानाही शशिकांत शिंदे यांचा देखील येथे ठराव होऊ शकला नाही. येथील मतदान बाद झाले. त्यामुळे ४८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना गाफील ठेवत रांजणे यांनी एकमताने विजय मिळवत बँकेत एन्ट्री केली होती. यावेळी बँकेच्या ठराव प्रक्रियेपासूनच मंत्री भोसले यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना ठराव घेतानाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
…तरीही शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दांडगा
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांचं म्हणावं तितकं बळ तालुक्यात दिसून येत नाही. त्यांच्याच गटातील काही कार्यकर्ते हे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना काही प्रमाणात पडद्याआडून सहकार्य करत असल्याचे राजकीय चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच अनेक हक्काच्या सोसायटी मधील शिंदेंचे ठराव बारगळले. सध्यादेखील जेमतेम १२ च्या आसपास सोबत मतदार आहेत.तरी देखील शिंदेंचे कार्यकर्ते दांडगा आत्मविश्वास ठेवून आहेत. याउलट मंत्री भोसले यांचे कार्यकर्ते कामावर भर देऊन बँक निवडणुकीत काम करताना पहायला मिळत आहेत.
केळघर पंचायत समिती सदस्य अतिष कदम यांची निष्ठा शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे यांच्यावर अधिक आहे. सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर अतिश कदम चांगलेच चमकलेले पाहायला मिळाले. मात्र, नुसतीच चमकोगिरी करणाऱ्या कदमांना त्यांच्याच वरोशी या चार गावांची असलेल्या सोसायटीचा ठराव घेता आला नाही, ही शोकांतिका.मग गणातील इतर सोसायटी ठराव शिंदेंना देणे तर लांबच यावरूनच त्यांचे स्थान व राजकीय कौशल्य दिसून येत आहे. येथील ठराव झालेले शिर्के हे सध्या सहलीवर आहेत.