
Maharashtra Politics : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला; उमेदवारी मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पुणे : महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बारामती उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये दाखल झालेल्या ५९ अजर्जापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत, तर ६ अर्ज फेटाळण्यात आले. आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, नेमके किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती व राहुरीत २३ रोजी मतदान होणार असून, निकाल ४ मे रोजी आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार न देता या निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने अचानक आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून ‘जातीय कार्ड’ खेळले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यापुढील आव्हान वाढले असून, ही लढत आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोधची शक्यता धूसर झाली आहे. बारामतीत उमेदवारांमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे तसेच ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे.
भाजपकडून ठोस पाठिंब्याचा शब्द
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपकडून ठोस पाठिंब्याचा शब्द देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निवडून येण्यासाठी सर्वतोपरी मदत करू
राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेल्या होत्या. यावेळी फडणवीस यांनी पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करेल, असे आश्वासन दिले.