संग्रहित फोटो
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत आहे. सूत्रांनुसार, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे (अजित आणि शरद पवार) विलीनीकरण करण्यास पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार तयार आहेत. मात्र, पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील. यामुळे दुसऱ्या गटातील नेत्यांचे वर्चस्व वाढून आपली राजकीय किंमत शून्य होईल, अशी भीती पटेल आणि तटकरे यांना सतावत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात पटेल आणि तटकरे सावलीसारखे सोबत असायचे. मात्र, यावेळी त्यांनी अंतर राखल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान पटेल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, राष्ट्रवादीचे संयुक्त नेतृत्व कोणाकडे असेल? विलीनीकरण झाल्यास शरद पवार गटाचे वर्चस्व वाढेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे संकेत पटेलांनी दिले आहेत.
आमची भूमिका काय?
या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी थेट सवाल केला की, विलीनीकरणानंतर पक्षात त्यांचे स्थान काय असेल? यावर सुनेत्रा पवार यांनी पटेल यांना आश्वस्त केले की, आपल्या गटातील नेत्यांचे महत्त्व कायम राखले जाईल आणि कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. पटेल आणि तटकरे यांना भीती आहे की, विलीनीकरणानंतर ते शरद पवारांच्या निशाण्यावर असतील. कारण, राष्ट्रवादी फोडण्यामागे या दोन नेत्यांचीच मुख्य भूमिका होती, असे खुद्द शरद पवार मानतात.
राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे जाणार?
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता, तेव्हा अजित पवार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालवत होते. कोणत्याही पक्षनेत्याने त्यांना आव्हान देण्याचे धाडस केले नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर, पक्षाची संपूर्ण निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ यांच्या हाती आली आहे. पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नियंत्रणाखाली येऊ नये म्हणून, सुनेत्रा पवार यांनी अजित यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि राज्यातील राजकारणाचा (Political News) नवा अध्याय सुरु झाला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राष्ट्रवादीवर नेतृत्व कोणाचं? सुनेत्रा पवार की तटकरे अन् पटेलांचं? वर्चस्वाची लढाई सुरु






