
'राम मंदिर तुमच्या बापाची जहागीर नाही'; नागपुरातील रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करत राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
ठाकरे म्हणाले की, राम मंदिर कोणाच्या मालकीचे नसून ते संपूर्ण देशातील रामभक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. कथित चोरीप्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रामभक्तांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी नीट आणि इतर पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत तरुणांना न्याय मिळणे हेच खरे हिंदुत्व असल्याचे म्हटले. तसेच बाबरी मशिद प्रकरण, महाविकास आघाडीची स्थापना आणि भाजपसोबतचे संबंध यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, “भागवत साहेबांना विचारायचं आहे की, मंदिर लुटलं जात आहे, पेपर फुटत आहेत, पक्ष फोडले जात आहेत आणि आता मंदिरातील तिजोऱ्याही फोडल्या जात आहेत. हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय?” यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांची हिंदू राष्ट्राची कल्पना ही न्याय, समानता आणि रामराज्याच्या तत्त्वांवर आधारित आहे. “आमच्या हिंदू राष्ट्रात गोरगरीबांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. कंत्राटदारांना संरक्षण देणारी व्यवस्था हे आमचं हिंदू राष्ट्र असू शकत नाही,” असे ते म्हणाले.
मोहन भागवत यांनी हिंदू समाजाने दोन ते तीन अपत्य जन्माला घालावीत, असे केलेल्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला. त्यावर ते म्हणाले, “मुलं जन्माला घालायला सांगता, पण त्यांच्यासाठी सुरक्षित शिक्षण व्यवस्था देणार कोण? पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले, काहींनी आत्महत्याही केल्या. अशा परिस्थितीत आणखी मुलं जन्माला घालून त्यांनाही याच व्यवस्थेत चिरडायचं का?”
सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची घोषणा केली. सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. हे स्पष्ट करावे, अशी मागणी करत त्यांनी आगामी काळात देशभर हा मुद्दा घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला.