
Operation Tiger : उज्ज्वल निकम यांचे मोठे भाष्य; ठाकरे गटातील 6 खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
कल्याणमध्ये कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या ‘मिशन टायगर’वर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी केली असली, तरी त्यांनी मूळ पक्ष सोडल्याचे कुठेही जाहीर केलेले नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले.
मात्र या सहा खासदारांवर कोणाचा व्हिप लागू होणार, त्यांना स्वतंत्र गटाचा नेता मान्यता मिळणार का आणि लोकसभा अध्यक्षांनी नेमका काय निर्णय घेतला आहे, यावरच पुढील राजकीय आणि कायदेशीर घडामोडी अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील या घडामोडींची लढाई आता राजकारणापेक्षा अधिक कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे संकेत निकम यांनी दिले आहेत.
फुटीर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सह्यांचे पत्र दिले असून त्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची भीती त्यात व्यक्त केली आहे. हे पात्र 48 तासांपूर्वी दिले गेले असले तरीही शिवसेनेच्या वर्धापनदिनी म्हणजेच 20 जून रोजी याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच दिवशी बुलेटिन जारी करण्यात येणार असून त्यामध्ये या खासदारांचे शिवसेनेत विलीनीकरण होत असल्याचं जाहीर कारणात येण्याची शक्यता आहे.
यावेळी संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला. फुटीर खासदारांवर टीका करत ते म्हणाले, “लोकांनी मतदान भाजपच्या विरोधात केलं. एकनाथ शिंदेच्या विरोधात केलं, लोकांनी मशाल चिन्हाला मतदान केलं. हे सर्व लोक एकनाथ शिंदेंच्या पक्षविरोधात जिंकून आले आहेत. शिर्डीच्या खासदारने दोनवेळा गद्दारी केली. तरीही त्याला तिकीट दिल. काही लोकांना पक्षात घ्यायला माझा विरोध होता. ते पुन्हा पुन्हा बेईमानी करतील, असं मी सांगत होतो. पण, उद्धव ठाकरे दयाळू आहेत. त्यांनी या लोकांना संधी दिली. आता या लोकांना वाटतंय त्यांनी फार मोठा तिर मारलाय, पण हा तिर त्यांच्याच ***” असे म्हणत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला.