
'मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,' मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा
पुण्यातील मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या इमारत दुर्घटनेत नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावरूनच आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला असून ‘मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन!’ असे म्हणत प्रशासनावर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत जोरदार टीकास्त्र सोडले. यावरून पुन्हा एकदा मोशी कचरा डेपोचा प्रश्न उपस्थित होत आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून विजय वडेट्टीवार म्हणाले, “मोशी कचरा डेपोतील नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेच्या मग्रुरीने घेतलेला बळी आहे. कचऱ्याच्या ६५-७० फूट उंच ढिगाऱ्याच्या अवघ्या ३० मीटर अंतरावर प्रशासकीय इमारतीला परवानगी देणारे अधिकारी नेमकं कुणाच्या आशीर्वादाने काम करत होते? कायदे, पर्यावरणाचे नियम आणि मानवी जीव यांना पायदळी तुडवून परवानग्या वाटणाऱ्या या यंत्रणेच्या हाताला आज नऊ जणांच्या रक्ताचे डाग लागले आहेत.”
मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन! मोशी कचरा डेपोतील नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेच्या मग्रुरीने घेतलेला बळी आहे. कचऱ्याच्या ६५-७० फूट उंच ढिगाऱ्याच्या अवघ्या ३० मीटर अंतरावर प्रशासकीय इमारतीला परवानगी देणारे… pic.twitter.com/hgev9M8Zz9 — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 27, 2026
ते पुढे म्हणाले, “PPP आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खेळ झाला, पण सुरक्षिततेच्या नावाने शून्य काम झाले. नियम धाब्यावर बसवून कंत्राटदार, अधिकारी आणि सत्तेच्या जवळचे लोक आपली तिजोरी भरत राहिले, आणि निष्पाप कामगार मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर मृतांच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाचा निर्लज्ज चेहरा आहे.”
“या प्रकरणात केवळ चौकशीची घोषणा नको, तर संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधासह कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने तुरुंगात पाठवले पाहिजे. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा मोशीतील हा ढिगारा फक्त कचऱ्याचा नव्हता, तर या सरकारच्या संवेदनाहीन आणि भ्रष्ट कारभाराचा होता, हेच इतिहासात नोंदवलं जाईल,” असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली.