warm welcome to MLA Relief and Rehabilitation Minister Makarand Patil
शिरवळ : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा सन्मान मिळाला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची पुणे सातारा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या शिंदेवाडी निरा नदी पात्रालगत त्यांचे ढोल ताश्याच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक आणि फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी लवकरच चौदा गावांचा पाणी प्रश्न पूर्णत्वास नेला जाईल अशी ग्वाही दिली.
तब्बल ४५ वर्षांनंतर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा सन्मान मिळाला असून, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आज (दि.२५ ) सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या हा पहिला अधिकृत जिल्हा दौरा आहे. मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे जोरदार तयारी करण्यात आली होती. स्वागत केल्यानंतर शिरवळ या ठिकाणी शिरवळ ग्रामपंचायत व सरपंच रविराज दुधगावकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले. पुढे नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाची भेट देत अभिवादन केले.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नायगाव येथील आयोजित स्वागत समारंभात बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी मतदारसंघातील प्रलंबित चौदा गावांच्या पाणी प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही दिली. तसेच, देवघर प्रकल्प आणि सिंचन योजनांच्या मंजुरीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, “या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती सरकारने मला मंत्रीपदाची संधी दिली आहे. पाणीप्रश्न, रस्ते आणि धरणग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मांढरदेवी रस्ता व इतर कनेक्टिव्हिटी प्रकल्पही लवकरच मार्गी लागतील.जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मला मोठी जबाबदारी देतो. विरोधकांनी घराणेशाहीचा मुद्दा उचलला होता, मात्र जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या कार्यकाळात मंजूर झालेला शंभर कोटींचा आराखडा आता पूर्णत्वास नेण्याचा माझा संकल्प आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी, आणि इतर धरण प्रकल्पांच्या धरणग्रस्तांच्या समस्यांवर लवकरच न्याय दिला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मकरंद पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे खंडाळा, महाबळेश्वर आणि वाई मतदारसंघातील जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. मंत्रीपदाच्या रूपाने या भागाचा विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील,जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले,पंचायत समितीचे सभापती राजेंद्र अण्णा तांबे, नितीन भरगुडे, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, बाळासाहेब सोळस्कर,मनोज पवार तसेच पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकारी उपस्थित होते.