
फोटो सौजन्य - Social Media
दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने या अतिपर्जन्यवृष्टीमुळे रामजीबुवा पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव काही प्रमाणात खचला होता.मात्र पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नव्हता. हा पूल नव्यानेच बांधण्यात आला असून या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्यानेच भराव करण्यात आला होता. पूल बांधण्यात आल्यानंतर हा पहिलाच पाऊस असल्याने काही प्रमाणात रविवारी येथील भराव खचला होता.मात्र सोमवारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी पाहणी करून अंमलबजावणी केली व पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत भराव टाकत वाहतूक पूर्ववत सुरू केली.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल आहिरे, उपअभियंता दिनेश पवार, शाखा अभियंता कोहाळे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करीत या पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातारा येथील कार्यकारी अभियंता राहुल आहिरे म्हणाले, “रामजीबुवा पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्यानंतरचा हा पहिलाच पाऊस आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव टाकण्यात आला होता. पहिल्याच पावसात हा भराव काही प्रमाणात खचला. मात्र आज त्या ठिकाणी दोन्ही बाजूंना पुन्हा मजबूत भराव टाकण्यात आला असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तसेच पुलाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.”