
वर्षातून गावातील सर्वजणं आपल्या गुरांना पाळीव प्राण्यांना घेऊन काही दिवसांसाठी गाव सोडतात. गावाच्या वेशीबाहेर राहतात त्याला म्हणतात गावपळण. ही प्रथा सहसा सिंधुदुर्गात पाहायला मिळते. आता ही नेमकी प्रथा आहे तरी काय ? तर याबाबत दंतकथा सांगितली जाते. गोष्ट अशी की, गावदेवतेला कौल लावला जातो आणि एक तारिख देवाच्या इच्छेने ठरवली जाते. त्या दिवशी गावकरी आपल्या मुलाबाळांना, गुरांना आणि पाळीव प्राण्यांना घेऊन गावची वेस सोडतात. हे दोन ते तीन किंवा कधी कधी त्याहून जास्त दिवस गावकरी गाव सोडून दुसऱ्या गावात राहता किंवा ज्यांचं परगावी कोणी नाही अशी माणसं गावच्या वेशीबाहेर राहतात.
यामागे आख्यायिका अशी की, गावातील देवतांनी इतर शक्तीबरोबर करार केलेला असतो त्यामुळे या दिवसात गावात सजीवांचं वास्तव्य अमान्य असतं. यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गावपळण आणि दुसरं म्हणजे देवपळण. गावपळण म्हणजे देवाचा कौल लागल्यानंतर जेव्हा फक्त गावकरी बाहेर पडतात ते गावपळण आणि दुसरं म्हणजे देवपळण. देवपळण पद्धतीत देवाचा कौल लागल्यानंतर गावकऱ्यांबरोबर गावाची वेस ओलांडताना देवसुद्धा वेस ओलांडतात.
याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर, यामागे देखील एक अर्थ आहे. गाव म्हणजे काय तर ठराविक माणसं एका ठिकाणी राहतात आणि कालांतराने त्यांची ओळख वाढत जाते आणि शेजार धर्म घट्ट होतो, हाच या प्रथेमागचा हेतू आहे. गावपळण प्रथेमुळे गावातले सर्व गावकरी एकत्र वेशीबाहेर राहतात. या निमित्ताने एकत्र जेवण, एकत्र गप्पा गोष्टी होतात. माणसामाणसांमधील हेवेदावे यामुळे नाहीसे होतात. तसंच गावातील गावपण राखलं जातं गावाची एकी यातून अधिक घट्ट होते. त्यामुळे पिढ्यानपिढ्या सुरु असलेली ही परंपरा आजतागायत सुरु आहे. आणि प्रथा आजही गावकरी अगदी आनंदाने साजरी करतात.