
फोटो सौजन्य- pinterest
काही लोक तर याचे पुरावे शोधून नास्तिकांचे मत बदलण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अनुसंधानकर्ता डॉक्टर राम अवतार यांनी रामायणावर व श्रीराम आणि सीतेच्या आयुष्यातील घटनांचा अभ्यास करून त्या निगडित २०० पेक्षा जास्त जागा शोधून काढल्या आहेत. त्यातील प्रमुख काही ठिकाणे. या पाऊलखुणा आजही श्रीरामांची साक्ष देत आहेत.
श्रीराम व सीता यांना १४ वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे. या वनवासादरम्यान या तिघांनी कुठल्या ठिकाणी वास्तव्य केले हे जाणून घेऊया.
श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा संशोधक व वाल्मिकी रामायणानुसार ते सर्वात आधी अयोध्येहून २० किमी लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज (अलाहाबाद ) पासून २०-२२ किमी असलेल्या शृंगवेरपूरला गेले. या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते. याच ठिकाणी श्रीराम गंगानदीच्या किनारी गेले आणि तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितले.
प्रयागराजपासून उत्तर -पश्चिमेच्या दिशेने ३५-३६ किमी लांब सिंगरौर नावाचे गाव होते. कदाचित हेच गाव श्रुंगवेरपूर असू शकते. रामायणात या गावाचा उल्लेख आला आहे. हे गाव गंगानदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते. महाभारतात या स्थानाचा उल्लेख “तीर्थस्थळ” या नावाने झाला आहे.
प्रयागराज जिल्ह्यातच कुरई नावाचे गाव आहे. हे गाव गंगा नदीच्या किनारी सिंगरौर गावाच्या जवळच आहे. गंगा नदीच्या ह्या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरौर आहे. सिंगरौर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम. सीता व लक्ष्मण ह्याच गावात उतरले होते. या गावात एक लहानसे मंदिर आहे. असे म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते. त्याच ठिकाणी आज हे मंदिर बांधलेले आहे.
कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. या ठिकाणी गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम आहे. हे ठिकाण सर्व हिंदूंसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकुटला पोहोचले. याच ठिकाणी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामाच्या वतीने राज्यकारभार सांभाळला.
चित्रकूटच्या जवळच मध्यप्रदेशातील सतना या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. अत्रि ऋषी चित्रकूटच्या तपोवनात राहत होते.
याठिकाणी श्रीरामांनी काही काळ सीता व लक्ष्मण यांनी वास्तव्य केले.
अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील घनदाट जंगलांत काही काळ आश्रय घेतला. हे वन म्हणजेच दंडकारण्य होय.
याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. १४ वर्षांपैकी १० वर्षे ते या ठिकाणी वास्तव्यास होते.
दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत, आणि वने पार करून नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता. श्रीरामांनी लक्ष्मण व सीतेसह या आश्रमात काही काळ व्यतीत केला. अगस्त्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली. श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान आणि ध्यान केले . नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते.
मारिच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झाला होता. याच ठिकाणी जटायू व श्रीरामांची मैत्री देखील झाली होती. वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात पंचवटीचे अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे.
नाशिकमध्ये मारीच, खर व दूषण यांच्या वधानंतर रावणाने सीतेचे हरण केले आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला.
या घटनेचे स्मारक नाशिकपासून ५६ किमी लांब असलेल्या ताकेड गावात “सर्वतीर्थ” नावाच्या ठिकाणी आहे. जटायूचा मृत्यू याच ठिकाणी झाला. हे ठिकाण इगतपुरीमध्ये आहे. या ठिकाणाला “सर्वतीर्थ” असे म्हणतात कारण याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायूने सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितले.
पर्णशाला हे ठिकाण आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम येथे स्थित आहे. हे ठिकाण रामालयहून १ तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाणाला पनसाला किंवा पनशाला असेही म्हणतात.
याच ठिकाणी रावणाने सीतामातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच ह्या ठिकाणाला सीतामातेचे हरण स्थळ मानतात. याच प्रदेशात राम सीतेचे प्राचीन देऊळ आहे
सीतेच्या शोधाचे प्रथम स्थान म्हणजे जेथे जटायूचा मृत्यू झाला (सर्वतीर्थ) ते होय. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा व कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला.
तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेले. जटायू व कबंधची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋष्यमूक पर्वतावर गेले. त्या ठिकाणी जाताना ते पम्पा नदीच्याजवळ असलेल्या शबरी या रामभक्त स्त्रीच्या आश्रमात गेले.
भगवान श्रीराम वनवासात जाताना व पुढे सीतामाईचा शोध घेताना अनेक भागात गेले. आज हे स्थान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहेत. श्रीराम यावेळी सर्वचस्थरातील लोकांना भेटले. आजही या पाऊलखुणा अस्तित्वात आहेत. त्यामुळे जनमानसात आजही असलेले श्रीरामाचे स्थान देव म्हणून तर आहेच. माझ्या पूर्वजांना राम भेटला. माझ्या भागात राम येऊन गेले. याचाही अवर्णनीय आनंद असतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: राजा दशरथांनी कैकयीला दिलेल्या वचनामुळे श्रीराम यांना १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला.
Ans: वनवासात श्रीराम यांनी शृंगवेरपूर, चित्रकूट, दंडकारण्य, पंचवटी (नाशिक), पर्णशाला (भद्राचलम) अशा अनेक ठिकाणी वास्तव्य केले.
Ans: हा प्रवास त्याग, धर्मपालन, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानला जातो.