
फोटो सौजन्य- pinterest
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
देशात जगत् जननी देवी आई विविध रुपात वास करते. तिची अनेक रूपे भक्तांसाठी करुणामय आहेत. तिची वात्सल्य नजर नेहमीच भक्तांवर असते. देवी आईचा भक्ताने धावा केला की देवी संकटकाळी मदतीसाठी धावत येते. आपल्या देशात देवीची मंदिरे डोंगरमाथ्यावर वसलेली आहेत. देवी आई तेथून भक्तांना आशीर्वाद देत असते. ती भक्तांना दिलासा देते, की भिऊ नकोस..! महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डोंगरमाथ्यावर देवीची वसलेली मंदिरे पाहिली की याची प्रचिती येते. यामागे भक्तांची श्रद्धा असते की, देवी आईचे दर्शन मला कुठून व्हावे. या देवींच्या आख्यायिका ही एखाद्या कुटुंबाच्या, समाजाच्या कुलस्वामिनी आहेत. अशीच एक देवी पुण्यातील ताम्हिणी घाट परिसरात वसलेली आहे. तिचे सुंदर रूप भक्तांना आश्वासक आहे. ती भक्तांच्या हाकेला धावून येते. ती देवी माता म्हणजे ‘आई विंझाई देवी’ आज आपण या विंझाई देवी बद्दल माहिती जाणून घेऊयात
ऐतिहासिक पार्श्वभूमीनुसार असे म्हटले जाते की, श्री महादेव आणि श्री राम प्रभू हे बंधू विंध्याचल पर्वतावर तप करीत असताना ज्येष्ठ बंधू महादेव प्रभू यांनी देवीचरणी आपले शिरकमल वाहून देहत्याग केला. कनिष्ठ बंधू श्री राम प्रभू त्याच विचारात घरी परत न जाता तप करीत असताना त्यांना देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, ‘तू दक्षिणेकडे तुझ्या घराकडे चल, मी तुझ्यापाठोपाठ येते. उजाडेपर्यंत डोळे उघडू नकोस आणि मागे पाहू नकोस.’आज्ञेप्रमाणे राम प्रभू डोळे मिटून मार्गक्रमण करीत घराकडे निघाले. पहाटेच्या वेळी गार वाऱ्याची झुळूक आल्यानंतर दिवस उजाडला असे वाटून राम प्रभूंनी डोळे उघडून देवी खरोखरच येत आहे का हे पाहण्यासाठी वळून मागे पाहिले असता अग्नीचा मोठा लोळ येताना दिसला आणि तो अदृश्य झाला. त्याचवेळी आकाशवाणी ऐकू आली, ‘तू घाई केलीस, मी आता पुढे येणार नाही.’तो अग्नीचा लोळ जेथे अंतर्धान पावला, तेथे एक मोठी शिळा उत्पन्न झाली. पूर्वी हे स्थान डोंगराच्या पायथ्यापाशी आणि दुर्गम ठिकाणी असल्याने देवीचे दर्शन घेणे फारच अवघड होते. त्याचा विचार करून राम प्रभूंनी देवीच्या मूर्तीची स्थापना जवळच असलेल्या ताम्हिणी या गावी केली, अशी आख्यायिका आहे.
यानंतर रघुनाथ माधवराव देशमुख यांनी सांप्रतची देवीची मूर्ती पुण्याहून कारागीर आणून ताम्हिणीच्या डोंगरातच काळ्या पाषाणाच्या दगडात घडवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री जोशी गुरुजी यांनी १९४२ मध्ये केली. विशेष म्हणजे मंदिरात येणाऱ्या भक्तांनी श्री विंझाई देवस्थान मंडळाची १९७३ मध्ये स्थापना केली.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) या समाजाची ही कुलदेवता आहे. या समाजातील कुटुंबे एकत्र येऊन देवीची पूजा अर्चना करतात; तसेच हनुमान जयंतीच्या वेळी मोठा उत्सवदेखील होतो. त्यादरम्यान कार्यवाहक, विश्वस्त सर्वजण एकत्र येऊन होम हवन, कुमकुम आर्चन यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
घाटमाथ्यामध्ये वसलेले हे देवीचे एक धार्मिक स्थळ आहे. पुण्यापासून जवळच्या ताम्हिणी घाटामध्ये ते वसलेले असून त्या मंदिराची एक प्राचीन कथा प्रचलित आहे. या मंदिराचे नाव विंझाई देवी असे आहे. विंझाई देवीचे मंदिर हे रमणीय असे धार्मिक स्थळ आहे. पश्चिम घाटातील ताम्हिणीच्या निसर्गरम्य कुशीमध्ये विझांई देवीचे मंदिर आहे. आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. अनेकांची ही देवी कुलस्वामिनी आहे. हे मंदिर पुण्यापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटामध्ये वसलेले आहे. या देवीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.
देवीच्या मंदिरातील आतील भाग संगमरवरी आहे. मूर्ती अडीच फूट उंचीची, चतुर्भुजा महिषासूरमर्दिनीची शिलामूर्ती आहे. उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात ढाल आणि पुढील उजव्या हातात महिषासुराच्या पाठीत खुपसलेला त्रिशूल आणि डाव्या हातात महिषासुराचे दाबलेले तोंड आहे. देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर व डावा पाय जमिनीवर घट्ट रोवलेला, तसेच पदर खोचलेला, मस्तकावर मुकूट, मोकळे सोडलेले केस आणि कपाळावर मळवट अशी प्रसन्न मूर्ती आहे. हे मंदिर प्राचीन आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाने यथाशक्ती केलेल्या दानामुळे मंदिर नीटनेटके व मंदिराची वास्तु भव्य आहे. मूळ मंदिरात जाण्याआधी आवारात कालिका मातेचे व दुसरे हनुमानाचे मंदिर आहे. तसेच मंदिराच्या मागील भागात भक्त निवास आहे. या भक्त निवासात चार रूम आहेत, पण इथे राहायचे असेल तर तुम्हाला ट्रस्टची परवानगी घ्यावी लागेल आणि मुळात हे गाव अतिशय लहान असल्यामुळे तुम्हाला इथे हार-फुलेसुद्धा मिळत नाहीत व इथे राहायचे असल्यास जेवणासाठी बाजूलाच पाच-सहा घरांची वस्ती आहे, त्यांना जेवायची ऑर्डर दिल्यास ते तुम्हाला गरम गरम पिठलं भाकरी, भात याचे चुलीवरचे सुग्रास जेवण देतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: विंझाई देवी ही महाराष्ट्रातील अनेक भाविकांची श्रद्धास्थान मानली जाणारी देवी आहे. भक्तांच्या मते ती शक्तीचे रूप असून संकटात भक्तांचे रक्षण करते.
Ans: लोकश्रद्धेनुसार राम यांनी वनवासाच्या काळात या परिसरात येऊन देवीची स्थापना केली. त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Ans: मंदिर डोंगररांगांमध्ये आणि घनदाट जंगलात वसलेले आहे. शांत आणि पवित्र वातावरणामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक अनुभव मिळतो.