
पुराणांनुसार, एकदा भगवान शिव बोलता बोलता बोलून गेले की, “हे संपूर्ण जग माया आहे आणि अन्नालाही काही खरं अस्तित्व नाही.” त्यांच्या या विचाराने पार्वती देवी नाराज झाल्या. कारण अन्न हे प्रत्येक सजीवाच्या जगण्याची मूलभूत गरज आहे आणि त्याला “माया” म्हणणे म्हणजे या निसर्गचक्राला नाकारणे होय. या अन्नाचं महत्व महादेवांना पटवून द्यायलाच पाहिजे असं पार्वतीमातेने ठरवलं. पार्वती देवीने संपूर्ण जगातून अन्न नाहीसे केले.अन्न नाहीसे होताच पृथ्वीवर भीषण परिस्थिती निर्माण झाली. सर्व जीव उपाशी राहू लागले, देव-दानव सुद्धा व्याकुळ झाले. सृष्टीचा समतोल बिघडला आणि जीवन चक्र संपून जायला लागलं. या संकटातून शिवांनाही जाणवले की अन्न ही केवळ माया नसून, तीच सृष्टीचा आधार आहे.
अन्नपूर्णा देवी झाली प्रकट
शेवटी महादेवांनी पार्वती देवीची माफी मागितली. त्यानंतर पार्वती देवी काशी येथे अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकट झाल्या. त्यांनी अन्नदान सुरू केले आणि संपूर्ण सृष्टीचे पोषण केले.या प्रसंगात एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असा होता की, भगवान शिव स्वतः भिक्षुकाच्या रूपात अन्न मागण्यासाठी अन्नपूर्णा देवीसमोर गेले. देवीने त्यांना अन्न दिले आणि त्यातून अन्नाचे सर्वोच्च महत्त्व पटवून दिलं. याचं महत्व एवढंच नाही तर लग्नात देखील नवरी मुलीला सासरी जाताना अन्नपुर्णेची मूर्ती दिली जाते.
लग्नात मुलीला का देतात अन्नपूर्णेची मूर्ती ?
लग्नात मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा या कथेशी निगडित आहे. नववधू ही अन्नपूर्णेचे रूप मानली जाते. ती ज्या घरात जाते, तिथे अन्न, समृद्धी आणि सुख नांदावे, हीच या परंपरेमागील भावना आहे. म्हणूनच, अन्नपूर्णा देवीची मूर्ती देणे म्हणजे मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी समृद्धी, पोषण आणि अखंड सुखाचा आशीर्वाद देणे होय.अन्नपूर्णा देवी आपल्याला अन्नाचे महत्त्व, स्त्रीची भूमिका आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीचे महत्व शिकवते. त्यामुळेच आजही ही परंपरा श्रद्धेने आणि आदराने पाळली जाते.
नवीन घरात समृद्धी येण्यासाठी
मुलगी लग्नानंतर नव्या घरात जाते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याचा अर्थ असा की, तिच्या हातून त्या घरात कधीही अन्नाची व संपत्तीची कमतरता भासू नये.
गृहलक्ष्मीचे प्रतीक
भारतीय संस्कृतीत नववधूला “गृहलक्ष्मी” मानले जाते. लक्ष्मी देवी प्रमाणेच ती घरात सुख-समृद्धी आणणारी असते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती म्हणजे देवी पार्वतीचा मिळालेला आशीर्वाद म्हटलं जातं.
जबाबदारीची जाणीव
पूर्वीच्या काळात स्त्री घराच्या अन्नव्यवस्थेची प्रमुख होती. ही मूर्ती देऊन तिला घर सांभाळण्याची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी सूचित केली जात असे.
शुभतेचे आणि सतत अन्नसंपत्तीचे प्रतीक
धार्मिक श्रद्धेनुसार, ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा होते, तिथे अन्नाची कधीही कमतरता भासत नाही.
शास्त्रीय (धार्मिक) आधार
हिंदू धर्मग्रंथांमध्ये अन्नाला “ब्रह्म” मानले आहे. “अन्नं ब्रह्म”. अन्नपूर्णा देवी ही त्या अन्नब्रह्माची अधिष्ठात्री मानली जाते. म्हणून विवाहासारख्या शुभ प्रसंगी तिची स्थापना केल्याने नव्या संसाराला दिव्य आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं.
Ghrishneshwar Jyotirlinga: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची काय आहे पौराणिक कथा, जाणून घ्या
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)