
बाळाच्या बारशावेळी त्याच्या पाळण्याच वरवंटा ठेवण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. बारशाच्या दिवशी बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी, वरवंट्याला (पाटा-वरवंटा) साडीने गुंडाळून, चेन-टिकली लावून नटवून बाळाप्रमाणे पाळण्यात ठेवतात. असं म्हणतात की, ‘सटवाई’ किंवा वाईट शक्तींना चकवा देण्यासाठी आणि बाळाच्या रक्षणासाठी, तसेच बाळ सुदृढ व बळकट व्हावे हा यामगचा उद्देश असतो.
शास्त्र असं सांगतं की, बारशाला सटवाई देवी बाळाच्या नशिबाची नोंद करण्यासाठी येते. त्यामुळे, आधी वरवंटा पाळण्यात ठेवून सटवाईला भरकटवले जाते, जेणेकरून वाईट दृष्टी या वरवंट्यावर पडावी, बाळावर नाही.काही ठिकाणी या प्रथेला ‘पाचवी पूजन’ किंवा ‘सटवाईची पूजा’ म्हणतात. पाटा-वरवंटा या पूजेत महत्वाचे मानले जातात.ही प्रथा प्रामुख्याने बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाळली जाते.
याला जसं धार्मिक कारण आहे तसंच शास्त्रीय कारणं देखील आहेत. असं म्हटलं जातं की, बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी पाळणा तपासून पाहण्यासाठी वरवंटा ठेवला जातो. वरवंटा जड असल्याने आधीच कळतं पाळण्यामध्ये कुठलीही समस्या नाही. वरवंटा हा स्थिर आणि जड असतो आणि पाळणा रिकामी ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाईट शक्तीना लांब ठेवण्यासाठी पाळण्यात वरवंटा ठेवला जातो. वरवंटा हा भूमी तत्वाशी निगडीत आहे. त्यामुळे कणखरपणा आणि सहनशक्ती वरवंटा दर्शवतो. वरवंट्याप्रमाणे बाळ देखील कणखर, सहनशील आणि स्थिर घडावं असाच दृष्टीकोन यामागे सांगितला आहे.
वरवंटा हा स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी मसाले, धान्य वाटण्यासाठी वरवंट्याचा वापर केला जायचा. त्यामुळे तो अन्न, पोषण आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो.वैद्यकीय सुविधा कमी असलेल्या काळात लोक पारंपरिक उपायांवर जास्त विश्वास ठेवत. बाळ आणि आई सुरक्षित राहावेत म्हणून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी केल्या जात. वरवंटा ठेवणं हे त्यापैकी एक संरक्षण असतं हा विचार त्यामागे असायचा.
धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.