
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Pakistan Cricket team : सध्या पाकिस्तान क्रिकेटभोवती मोठे वाद निर्माण झाले आहेत. असे समोर आले आहे की, पाकिस्तानचे स्टार फलंदाज बाबर आझम आणि फखर जमान तंदुरुस्त नसतानाही २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक संघात निवड झाली तेव्हा बाबर आणि फखर पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. असा दावा केला जात आहे की, विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्यांना दुखापत झाली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) वैद्यकीय समितीने यावर शंका व्यक्त केली आहे.
अलीकडेच, पाकिस्तान क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवडकर्ता आकिब जावेद यांनीही पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. आता, खेळाडूंच्या दुखापती लपवून त्यांना खेळू दिल्याबद्दल संघाचे फिजिओ क्लिफ डीकन यांच्यावर आरोप केले जात आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका जवळच्या सूत्राने खुलासा केला आहे की, टी-२० विश्वचषकानंतर ब्रिटिश क्रीडा वैद्यकीय तज्ञ डॉ. जावेद मुघल यांनी दोन्ही खेळाडूंची तपासणी केली असता चिंता व्यक्त केली होती.
विशेषतः बाबरची दुखापत अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे दिसून आले, तर फखर गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच समस्येने त्रस्त होता. विश्वचषकानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाबरने राष्ट्रीय टी-२० चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यास नकार दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, फखरलाही तंदुरुस्तीच्या समस्या भेडसावत होत्या. सूत्रांनुसार, निवड समितीने वैद्यकीय पॅनेलला स्पष्ट केले होते की, फिजिओची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांनी दोन्ही खेळाडूंची संघात निवड केली होती.
मात्र, आता असे म्हटले जात आहे की, फिजिओने यापूर्वी किरकोळ दुखापत झालेल्या खेळाडूंनाही खेळण्याची परवानगी दिली होती. बाबर सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत असून, तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. दरम्यान, फखर जमानने अलीकडेच सांगितले की, तो बांगलादेश मालिकेदरम्यान पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, परंतु आता तो टी-२० स्पर्धेसाठी सज्ज आहे.
सूत्रांनुसार, बाबरच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय आधीच घेतला होता. दुखापतीचे प्रकरण नंतर समोर आले. बाबर सध्या खराब फॉर्ममधून जात असून, त्याची बॅट काही काळापासून शांत आहे. आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता टी-२० विश्वचषक यांसारख्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत तो अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळेच पाकिस्तानी निवड समितीचा त्याच्यावरील विश्वास उडत आहे.
आकडेवारीनुसार, बाबरने यावर्षी सात टी-२० सामन्यांमध्ये केवळ १६७ धावा केल्या असून, त्याची सरासरी फक्त २७ आणि स्ट्राइक रेट ११७.६ आहे. एकदिवसीय सामन्यांमधील त्याची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. २०२५ मध्ये त्याने ३४ च्या सरासरीने आणि ७७.१६ च्या स्ट्राइक रेटने फक्त ५४४ धावा केल्या.