
IND Vs ENG : इंग्लंडने पाचवा T-20 सामना 56 धावांनी जिंकला; 4-0 ने जिंकली मालिका
साउथम्पटन : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने भारताला ५६ धावांनी पराभूत केले. यासह, इंग्लंड संघाने मालिका ४-० ने जिंकली आहे. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, तीनपेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही.
शनिवारी (दि.११) खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जी एक चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर २५८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकांत २५७/३ धावा केल्या. जॉस बटलरने ६४ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३१ धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रूक ४५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर नाबाद राहिला. फिल सॉल्ट ९ चेंडूंमध्ये ६ धावा करून बाद झाला. जेकब बेथेल पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. विल जॅक्सने २ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या.
२५८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. अभिषेक शर्माच्या रूपाने २१ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. त्याने केवळ तीन धावांचे योगदान दिले. त्यानंतर संजू सॅमसन १४ चेंडूंमध्ये २७ धावा करून ५५ धावांवर बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ३० चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर १६ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला.
तिलक वर्माचे २५ चेंडूंमध्ये ५३ धावा
भारताच्या विकेट्स एकामागून एक पडत राहिल्या. इशान किशनने ३५ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या आणि तिलक वर्माने २५ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या, पण ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. शिवम दुबेने १४, शेडगे ७, अक्षर पटेलने ३, अर्शदीप सिंगने ४ आणि प्रसिद्ध कृष्णाने १ धाव काढली. भारताला त्यांच्या निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ २०१ धावा करता आल्या आणि ५६ धावांनी सामना गमवावा लागला.
IND Vs ENG : भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट