
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण ४६ कसोटी सामने खेळले गेले आहे. त्यापैकी भारतीय संघाने २२, तर श्रीलंकन संघाने केवळ ७ सामने जिंकले आहेत. उर्वरित १७ सामने अनिर्णित राहिले आहेत. आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचेच वर्चस्व नेहमीच राहिले आहे.
श्रीलंकेने भारताविरुद्धची शेवटची कसोटी मालिका २००८ मध्ये जिंकली होती. त्या तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने भारताला २-१ ने पराभूत केले होते. त्यावेळी श्रीलंकेचे कर्णधारपद महेला जयवर्धनेकडे, तर भारताचे कर्णधारपद अनिल कुंबळेकडे होते. श्रीलंकेने भारताविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना २०१५ मध्ये जिंकला होता.
२००८ च्या पराभवानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात सहा कसोटी मालिका खेळल्या गेल्या असून, त्यापैकी भारताने पाच मालिका जिंकल्या आहेत, तर श्रीलंकेत झालेली २०१० ची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.
भारतीय कसोटी संघाने शेवटचा श्रीलंका दौरा नऊ वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेच्या आपल्या शेवटच्या दौऱ्यात ३-० ने दमदार विजय मिळवला होता. यापूर्वी, २०१५ मध्ये, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेला २-१ ने पराभूत केले होते. भारतीय संघाने आतापर्यंत श्रीलंकेत २४ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी ९ सामने जिंकले आहेत आणि ७ गमावले आहेत. याशिवाय, आठ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह या महत्त्वपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज आकिब नबीला संघात स्थान देण्यात आले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. त्यातच बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी