श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघात आणखी एक मोठा बदल झाला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीनंतर, साई सुदर्शनलाही या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. वृत्तानुसार, सुदर्शन दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी सरफराज खानची निवड केली आहे. तो लवकरच कोलंबो येथे भारतीय संघात सामील होईल. एकीकडे देवदत्त पडिक्कलने शतक ठोकून आपली दावेदारी मजबूत केली तर सरफराजच्या समावेशामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर गॉल कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
6,6,6… मियाँ मॅजिक! चेंडूने नाही, बॅटने केला कहर; Mohammed Siraj ची तुफानी फटकेबाजी, VIDEO व्हायरल
रविवारी, ९ ऑगस्ट रोजी भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यातील सराव सामना संपल्यानंतर लगेचच बीसीसीआयने या बदली खेळाडूची घोषणा केली. बीसीसीआयने म्हटले आहे की, सुदर्शनला उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाला असून तो दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. मंडळाने स्पष्ट केले की, प्रकृतीत सुधारणा होऊनही सुदर्शन कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही आणि म्हणूनच निवड समितीने सरफराज खानची निवड केली आहे.
सरफराजने भारतासाठी खेळलेल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये प्रामुख्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. काहीवेळा त्याला चौथ्या क्रमांकावरही पाठवण्यात आले होते. तेव्हा त्याने बंगळूरुमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले. त्यामुळे, गॉलमधील पहिल्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे.
साई सुदर्शन संघाबाहेर असल्याने, सर्वात मोठा प्रश्न तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, मात्र, सरफराजला ही जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रशिक्षक गंभीर कर्णधार शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकतात किंवा सराव सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कलला संधी मिळू शकते. सराव सामन्याच्या पहिल्या डावात पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, तर दुसऱ्या डावात त्या स्थानावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती.
सरफराज खान जानेवारी २०२५ पासून भारतीय संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो एकही सामना खेळला नाही. तो शेवटचा नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र, तेव्हापासून संघातून त्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याबद्दल निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावरही टीका झाली आहे. मात्र, आता त्याचे संघात पुनरागमन झाले आहे.
सलामीसाठी, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल वरच्या फळीतील फलंदाजीची धुरा सांभाळतील . ऋषभ पंत किंवा ध्रुव जुरेल पाचव्या क्रमांकावर, तसेच यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळू शकतो.






