मुंबई : भारतीय संघाने गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या झालेल्या सामन्यात आशिया कपच्या (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या (IND vs AFG) टीमचा धुव्वा उडवला. यामध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीममध्ये दिसला नाही. कालच्या सामन्यात टॉससाठी रोहित शर्मा ऐवजी केएल राहुल आला. यावेळी रोहित शर्मा सामन्यासाठी उपलब्ध नसण्याचं खरे कारण त्याने उघड केलं.
टॉससाठी आलेल्या कर्णधार केएल राहुलने सांगितलं की, कर्णधार रोहित शर्माला विश्रांतीची गरज होती. टीम मॅनेजमेंटला देखील असंच वाटत होतं. कारण टी २० वर्ल्डकप आगामी काळात आहे आणि मॅनेजमेंटला खेळाडू फ्रेश हवेत.
“रोहित शर्माला विश्रांती घ्यायची आहे. या परिस्थितीत बॅक टू बॅक सामने खेळणं सोपं नाही, असं केएल राहुलने सांगितलं आहे. टॉसवेळी केएल राहुल पुढे म्हणाला, “चहल, रोहित आणि हार्दिक या सामन्याचा भाग नाहीत. चहर, कार्तिक आणि अक्षर यांना टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे.”
टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानचा संघ ८ गडी गमावून केवळ १११ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद १२२ धावा केल्या. विराट कोहलीच्या शतकीय खेळीनंतर भुवनेश्वर कुमारचा कहर गोलंदाजीत पाहायला मिळाला. भुवनेश्वर कुमारने आपल्या ४ षटकात फक्त ४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आहेत.