
स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर
आता कंपन्यांना स्मार्ट टिव्ही आणि दुसरे डिव्हाईस बनवण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही आणि याचा फायदा ग्राहकांना देखील होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पुढील काही दिवसांत स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या डिव्हाईसच्या किंमती कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
सरकारने देशांतर्गत प्रोडक्शन वाढवण्यासाठी बेसिक ड्यूटी पूर्णपणे हटवली आहे. आता डिस्प्ले असेंबली, लिथियम-आयन सेल्स आणि इंडक्टर कॉइल मॉड्यूल तयार करण्यासाठी वापरले जाणारे मटेरिअल स्वस्त होणार आहे. ही सूट 31 मार्च, 2029 पर्यंत लागू राहणार आहे. याद्वारे सरकारला देशातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रोडक्शन वाढवायचे आहे आणि कंपन्यांचा खर्च कमी करायचा आहे. आतापर्यंत डिस्प्ले असेंबली आणि लिथियम-आयन सेल्स इत्यादासाठी भारत मोठ्या प्रमाणात चीन आणि वियतनामवर अवलंबून आहे. आता हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदत होणार आहे आणि इतर देशांवरील अवलंबित्व कमी होईल.
कोणत्याही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्टटिव्हीच्या एकूण खर्चात डिस्प्ले असेंबली आणि लिथियम-आयनचा मोठा वाटा असतो. यापूर्वी यावर 5 ते 7.5 टक्के बेसिक कस्टम ड्यूटी आकारली जात होती. मात्र आता केंद्र सरकारने बेसिक कस्टम ड्यूटी हटविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कंपन्यांना मटेरिअलची खरेदी करणं अधिक स्वस्त होणार आहे. ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कंपन्या भारतात उत्पादित लॅपटॉप, स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही यांसारखी डिव्हाईस कमी किमतीत देऊ शकतात.
एआय बूममुळे स्टोरेज आणि मेमोरी चिप्सची कमतरता निर्माण झाली आहे. कमी सप्लाय आणि वाढती मागणी यामुळे स्टोरेज आणि मेमोरी चिप्सच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याचा परिणाम स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या किंमतीवर होत आहे आणि या डिव्हाईसच्या किंमती देखील सतत वाढत आहेत. म्हणूनच ॲपलपासून सॅमसंगपर्यंत आणि लेनोवोपासून डेलपर्यंतच्या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीच्या किंमती वाढवत आहेत. आता, भारत सरकारच्या निर्णयानंतर, किमान भारतात बनवलेली उपकरणे तरी स्वस्त होतील अशी आशा निर्माण झाली आहे.