
baloch leader akhtar mengal slams pakistan army asim munir 1971 dhaka surrender 90000 soldiers
Akhtar Mengal statement on Pakistan army 1971 : पाकिस्तानच्या ताब्यातील बलुचिस्तान प्रांतात सध्या लष्कर आणि केंद्र सरकारविरोधात असंतोषाचा ज्वालामुखी पेटला आहे. बलुच जनतेवर होणारे अत्याचार, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि तरुणांचे बेपत्ता होणे या घटनांमुळे स्थानिक नेत्यांचा संयम आता पूर्णपणे सुटला आहे. अशातच बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री आणि बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे अध्यक्ष अख्तर मेंगल यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना जाहीर आव्हान दिले आहे. बलुचिस्तानमधील दडपशाहीवर कडाडून टीका करताना मेंगल यांनी थेट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेख करत पाकिस्तानी लष्कराच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मेंगल म्हणाले, “१९७१ मध्ये जेव्हा तुम्ही ढाकामध्ये भारतासमोर शरणागती पत्करली, तेव्हा आम्ही तुमचे शौर्य पाहिले होते. तुमच्या ९०,००० सैनिकांची केवळ शस्त्रेच नव्हे, तर त्यांच्या विजारसुद्धा अजूनही ढाक्यात लटकत आहेत.”
अख्तर मेंगल यांचा हा हल्ला पाकिस्तानच्या लष्करी हुकूमशाहीच्या थेट जिव्हारी लागणारा आहे. अलीकडेच बलुचिस्तानमधील प्रसिद्ध महिला हक्क कार्यकर्त्या मेहरंग बलुच आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाकिस्तानी न्यायालयाने जन्मठेपेची अमानुष शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण प्रांतात निदर्शने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मेंगल यांनी पाकिस्तानी लष्कराच्या कथित ‘शौर्या’चा बुरखा फाडला. ते म्हणाले की, जागतिक लष्करी इतिहासात ९०,००0 सैनिकांनी इतक्या अपमानास्पद रीतीने आत्मसमर्पण केल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. बंगाली जनतेवर अत्याचार करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला भारताने कसे गुडघे टेकण्यास भाग पाडले, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pax Silica : काय आहे अमेरिकेची ‘पॅक्स सिलिका’ महाआघाडी? ज्यामध्ये भारताला मिळाले मानाचे स्थान; पाकिस्तानला विचारलेही नाही
अख्तर मेंगल यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सल्ला दिला की, त्यांनी आपल्या मुलांना खोट्या शौर्यकथा सांगणे बंद करावे. ते म्हणाले, “पाकिस्तानी सैन्याच्या पराक्रमाबद्दल शालेय पुस्तकांमध्ये खोटा इतिहास शिकवला जातो. त्याऐवजी ढाक्यातील शरणागतीचा इतिहास प्रामाणिकपणे पुस्तकांमध्ये समाविष्ट करा, जेणेकरून तुमच्या पुढील १० पिढ्यांना हे वाचता येईल की त्यांची शस्त्रे आणि विजार पूर्व पाकिस्तानात का लटकत राहिली.” बंगाली जनतेने ज्या प्रकारे पाकिस्तानी सैन्याचा जुलूम उलथवून लावला, तसाच प्रतिकार आता बलुचिस्तानमध्येही आकाराला येत असल्याचा सुप्त इशारा त्यांच्या या वक्तव्यातून मिळतो.
“In the world’s military history, the Pakistan army is the only force that not only surrendered in such huge numbers (90000), but also left behind their Patloons (pants). Why don’t we teach that in our history books?” – Akhtar Mengal, ex CM Balochistan
pic.twitter.com/0dcnqQ5SOy — Pakistan Untold (@pakistan_untold) June 23, 2026
credit – social media and Twitter
अख्तर मेंगल हे बलुचिस्तानमधील अत्यंत प्रतिष्ठित आणि जुन्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे वडीलही या प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि मेंगल यांनी स्वतः १९९७ ते १९९८ या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड महत्त्व आहे. बलुचिस्तान नॅशनल पार्टीच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच पाकिस्तानी सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या बळजबरीच्या अपहरणांवर आणि हत्यांवर आवाज उठवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza : ‘हमासने लहान मुलांना बनवले मानवी ढाल, तुम्ही ते…’ भारतीय न्यायाधीश S Muralidhar यांच्या रिपोर्टने हादरला इस्रायल
१९४७ च्या फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) हा पाकिस्तानचाच एक भाग होता. परंतु, पश्चिम पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच बंगाली जनतेवर भाषिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अन्याय केला. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा बंगाली जनतेने आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी तीव्र आंदोलन सुरू केले, तेव्हा पाकिस्तानी सैन्याने तिथे ‘ऑपरेशन सर्चलाईट’ राबवून लाखो निरपराध नागरिकांची कत्तल केली. या दडपशाहीविरुद्ध भारताने तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लष्करी हस्तक्षेप केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला चारी बाजूंनी घेरले आणि अखेरीस १६ डिसेंबर १९७१ रोजी ९०,००० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर लोटांगण घातले, ज्यातून बांगलादेशची निर्मिती झाली.
हा ऐतिहासिक पराभव पाकिस्तानच्या लष्करासाठी गेल्या अनेक दशकांपासून सर्वात मोठा कलंक ठरला आहे. आज जेव्हा बलुचिस्तानमध्ये हुबेहूब १९७१ सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे, तिथेही जनतेचा आवाज बंद करण्यासाठी लष्कर हिंसाचाराचा वापर करत आहे, अशा वेळी अख्तर मेंगल यांनी थेट आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांना या पराभवाची आठवण करून देणे हे स्पष्ट करते की, बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे.