
BRG and UBA attack Pakistan Army 2026
दक्षिण आशियातील राजकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बनलेल्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पुन्हा एकदा हिंसाचाराचा मोठा भडका उडाला आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारच्या धोरणांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या बलुच बंडखोर संघटनांनी आता आपले हल्ले अधिक तीव्र केले असून, थेट पाकिस्तानी लष्कर आणि सरकारी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. बलुच रिपब्लिकन गार्ड्स (BRG) आणि युनायटेड बलुच आर्मी (UBA) या दोन प्रमुख सशस्त्र संघटनांनी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील वेगवेगळ्या भागात झालेल्या मालिकास्फोट आणि हल्ल्यांची अधिकृत जबाबदारी स्वीकारली आहे. या दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पाकिस्तानच्या ताब्यातून बलुचिस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा संघर्ष शांत होणार नाही आणि पाकिस्तानी सैन्यावरील हल्ल्यांची ही मोहीम अशीच सुरु राहील.
बीआरजीचे प्रवक्ते दोस्तैन बलुच यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेच्या लढवय्यांनी मंगळवारी रात्री बलुचिस्तानमधील नसीराबाद जिल्ह्यातील चत्तर भागाजवळ मोठा स्फोट घडवून आणला. या स्फोटात २२० केव्ही क्षमतेचे दोन मोठे वीज टॉवर पूर्णपणे नष्ट झाले आहेत. वीज टॉवर उडवून दिल्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला असून प्रशासनाचे मोठे आर्थिक आणि तांत्रिक नुकसान झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Army : 50 मैल अंतरावर थरार! टेक्सासमध्ये लष्कराचे अपाचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, VIDEO
याशिवाय, बीआरजीच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी कच्छ जिल्ह्यातील दाधर येथील एका महत्त्वाच्या सरकारी कृषी कार्यालयाला लक्ष्य केले. या कार्यालयात करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बीआरजीने केवळ बलुचिस्तानपुरते मर्यादित न राहता शेजारच्या सिंध प्रांतातही आपला प्रभाव दाखवला आहे. सोमवारी रात्री सिंधमधील शिकारपूरजवळ असणारे दोन महत्त्वाचे वीज टॉवरही स्फोटकांनी उडवून दिल्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे. हे सर्व हल्ले नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले असून यामुळे पाकिस्तानच्या पायाभूत यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.
दुसऱ्या बाजूला, युनायटेड बलुच आर्मी (UBA) या संघटनेने पाकिस्तानी सैन्यावर थेट हल्ला चढवला आहे. यूबीएचे प्रवक्ते मजार बलुच यांनी दावा केला आहे की, बोलान भागातील पंजरा पुलाजवळ असलेल्या दराझ बीट येथील पाकिस्तानी लष्करी तपासणी नाक्याला लक्ष्य करून रिमोट-कंट्रोल स्फोट घडवण्यात आला. सोमवारी संध्याकाळी साधारण ७:१० च्या सुमारास हा भीषण स्फोट घडवून आणण्यात आला.
यूबीएने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लढवय्ये गेल्या अनेक दिवसांपासून दराझ बीट आणि पंजरा ब्रिज या मार्गावरून जाणाऱ्या पाकिस्तानी लष्करी ताफ्यांवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. सैन्याची योग्य संधी साधून तपासणी नाक्याजवळ स्फोटक उपकरणे (IED) ठेवण्यात आली होती. जसे सुरक्षा कर्मचारी त्या भागातून पुढे गेले, तसा रिमोटच्या साहाय्याने जोरदार स्फोट घडवून आणला गेला. या भीषण हल्ल्यात पाकिस्तानचे ४ सुरक्षा कर्मचारी जागीच ठार झाले, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
या मालिकेतील मागील घटनांचा आढावा घेतला असता, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) देखील अत्यंत आक्रमक भूमिकेत असल्याचे दिसते. २ ऑगस्ट रोजी वाशुकमधील सेची भागात पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या पथकावर BLA च्या लढवय्यांनी हल्ला करून दोन सैनिकांना कंठस्नान घातले होते.
तसेच, नोकचाह आणि चगाई भागातील क्वेटा-ताफ्तान मार्गावरून जाणाऱ्या लष्करी ताफ्यावर आणि मौल्यवान खनिज संपत्तीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर BLA कडून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. ३ ऑगस्ट रोजी BLA ने अधिक आक्रमक पाऊल उचलत क्वेटा-कराची महामार्गावरील प्रसिद्ध बेला भागातील पोलीस तपासणी नाक्याचा ताबा घेतला होता. या सलगच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सैन्याची आणि प्रशासनाची झोप उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lashkar E Taiba: ‘भारताचा विनाश अटळ!’ शेख रशीदची भारताला थेट धमकी; हाफिज सईदबाबतचा गुलाम असल्याचा मोठा दावा
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने, खनिजांनी आणि वायू साठ्याने समृद्ध असलेला प्रदेश आहे. परंतु, पाकिस्तानी प्रशासनाकडून या भागाचे शोषण केले जात असल्याचा आणि स्थानिक बलुच लोकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप या विद्रोही संघटनांकडून वारंवार केला जातो. ‘जोपर्यंत स्वतंत्र बलुचिस्तानची स्थापना होत नाही, तोपर्यंत लष्कर आणि पाकिस्तान सरकारच्या आर्थिक हितसंबंधांवर असेच भीषण हल्ले चालू राहतील,’ असा इशारा सर्वच बंडखोर संघटनांनी दिला आहे.
सतत होणाऱ्या या स्फोटांमुळे आणि लष्करावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक लोकांचा पाठिंबा आणि भौगोलिक रचनेचा फायदा घेत बंडखोर संघटना पाकिस्तानी सैन्याला सतत चकवा देत मोठे नुकसान पोहोचवत आहेत.