
एक अशी जागा जिथे आता आपण श्वास घेतोय पण पुढचा श्वास घेऊ की नाही हे माहित देखील नाही. एक अशी जागा जिथे फक्त रक्ताचे पाट वाहत आहेत एक अशी जागा जिथे गोळीबार आणि बॉम्बब्लास्टचा आवाज कानी येतो. अशा युद्धजन्य ठिकाणातील आपल्या नागरिकांना परत आणण्याचं शिवधनुष्य पेललं ते 23 वर्षाीय महिला पायलट दीपिका अधाना यांनी.
युद्धात अडकलेल्या आपल्या नागरिकांना स्वदेशी परत आणण्यासाठी इंडिया एक्सप्रेसने पाठवलेल्या विशेष विमानाच्या पायलट होत्या दीपिका अधाना. मुळच्या हरियाणाच्या या बेटीने संयुक्त अरब आमिराती मधून एक नाही दोन नाही तब्बल 169 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणलंच नाही तर त्यांचे प्राण देखील वाचवले. जेव्हा ही जबाबदारी दीपिका यांच्यावर सोपवण्यात आली तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. बोलता बोलता त्या म्हणाल्या देखील आई, मला शेवटचं पाहून घे, कदाचित आजच्यानंतर मी तुला दिसणार नाही. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी देखील दीपिका यांना त्यांच्या कर्तव्यापासून मागे रोखलं नाही तर खांद्यावर दिलेली जबाबदारी लिलया पेलण्यासाठी बळ दिलं.
दीपिका सांगतात की, युद्ध खूपचं पेटलं आणि आपल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या हालचालींना वेग आला. त्यावेळी अचानक मला संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची सूचना मिळाली होती. खरंतर माझ्याऐवजी माझी कलिग मोहीमेवर जाणार होती. मात्र आयत्यावेळी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मी लगेच तयार होऊन मी माझ्या टीमसह निघाले. विशेष म्हणजे या टीममध्ये सगळ्या महिलाच होत्या. त्यात कॅप्टन जसविंदर कौर, वैमानिक दीपिका अधाना आणि इतर चार महिला क्रू सदस्यांचा समावेश होता. या 6 महिलांनी 169 भारतीयांना सुखरुप घरी आणलं.
दुपारी दोन वाजता विमान रास अल खैमाह विमानतळावर सुखरूपरीत्या उतरले. तिथे रोजच्या पेक्षा गर्दी कमी होती. मात्र तिथे कुठलं गडबड आणि गोंधळाचं वातावरण नव्हतं. तासाभराच्या कालावधीत विमानामध्ये 169 प्रवाशांना बसवण्यात आले. त्यानंतर साडे तीन वाजता विमानाने तिथून उड्डाण केले. यादरम्यान, एकदा विमानाचा एटीसीसोबत असलेला संपर्क तुटला. त्यामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र अल्पावधीतच संपर्क प्रस्थापित झाला आणि सुखरूपपणे वाटचाल करत हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केवळ 23 वर्षीय महिला पायलट आणि 5 विमानातील क्रु महिला ज्यांच्यामुळे आज कित्येक कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आहेत. भारताच्या या 6 रणरागिणींना नवराष्ट्रचा सलाम.