मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्षद्वीपचा दौरा, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या पर्यटनाचा आनंद (Narendra Modi Lakshadweep Visit) आणि त्यानंतर त्यावर मालदीवच्या मंत्र्यांच्या अवमानजनक प्रतिक्रया, वरवर सरळ दिसत असले तरी या गोष्टीमुळे मालदीव आर्थिक संकटात (Indian Tourist In Maldieves) सापडण्याची शक्यता जास्त आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्विपला भेट देत तेथे पर्यटनाला चांगला वाव असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मालदीवला जाणारा पर्यटक निश्चितपणे लक्षद्विपला वळू शकतो, यावरून तेथील मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्विपवरून टीका करायला सुरुवात केली. आता याविरोधात सोशल मीडियावर मोठा @BoycottMaldives ट्रेंड सुरू आहे.
विमान कंपन्यांनाही होणार तोटा
मालदीवच्या मंत्र्यांनी लक्षद्वीप आणि भारतीय पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्यानंतर भारतात सोशल मीडियावर BoycottMaldives ट्रेंड सुरू (India Bycott On Maldieves Tourism) झाला आणि त्याचवेळी हजारो भारतीयांनी मालदीमध्ये केलेले बुकिंग कॅन्सल केले आहे. विमान कंपन्यांनाही त्याचा तोटा सहन करावा लागतोय. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा भारतीय पर्यटकांचा आहे.
भारतातील लोकांमध्येही संताप
गेल्या वर्षापर्यंत मालदीवची गणना भारताच्या चांगल्या मित्रांमध्ये होत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोहम्मद मोइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे बिघडू लागले होते. मात्र, नुकत्याच घडलेल्या या प्रकरणामुळे भारतातील लोकांमध्येही संताप निर्माण झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
2 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले, त्यामध्ये ते समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करताना पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देण्याचे भारतीय पर्यटकांना आवाहन केले.
मालदीवच्या मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य
त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण, नेमकं त्याचमुळे आता मालदीवची कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी किती भारतीय पर्यटक मालदीवला जातात?
या संपूर्ण प्रकरणादरम्यान असा प्रश्न उपस्थित होत आहे की भारतीयांनी बहिष्कार टाकलेल्या मालदीवचा या बेटाच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल? दरवर्षी किती लोक या देशात येतात?
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे 2 लाख 09 हजार 198 भारतीय पर्यटक बेटावर पोहोचले होते. यापूर्वी 2022 मध्ये 2.41 लाख भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती. 2021 मध्ये 2.91 लाख आणि 2020 मध्ये कोरोना महामारी असूनही 63,000 भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती.
इतर देशांतील पर्यटकांच्या तुलनेत भारत कुठे आहे? (Maldieves Economy)
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत या बेटावर एकूण 17 लाख 57 हजार 939 पर्यटक आले होते. यामध्ये सर्वाधिक पर्यटक भारतीय होते. भारतीयांनंतर रशिया आणि चीनमधून सर्वाधिक लोक आले होते.
भारतावर बहिष्कार टाकल्याने काय परिणाम होईल? (India Bycott Impact On Maldieves Economy)
2021 मध्ये या बेटाला पर्यटनातून सुमारे 3.49 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळाला. यावरून या देशासाठी पर्यटन उद्योग किती महत्त्वाचा आहे याचा अंदाजही तुम्ही लावू शकता. मालदीवच्या जीडीपीपैकी 56 टक्के भाग पर्यटनातून येतो.
अशा परिस्थितीत भारत आणि मालदीव यांच्यात सुरू असलेल्या या वादानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार घातला तर या बेटाचे सुमारे 2 लाख पर्यटकांचे नुकसान होणार आहे.
पर्यटनाव्यतिरिक्त मालदीव या बाबींमध्येही भारतावर अवलंबून
2021 च्या आकडेवारीनुसार, या वर्षी भारत मालदीवचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे. हे बेट प्रामुख्याने भारतातून धातू आयात करते.
एवढेच नाही तर भारत मालदीवमध्ये विविध प्रकारच्या अभियांत्रिकी आणि औद्योगिक उत्पादनांची निर्यात करतो. त्यामध्ये फार्मास्युटिकल्स, रडार उपकरणे, रॉक बोल्डर्स, सिमेंट. त्यात तांदूळ, मसाले, फळे, भाजीपाला आणि पोल्ट्री उत्पादनांसारख्या कृषी उत्पादनांचाही समावेश आहे.
भारत आतापर्यंत नेहमीच मालदीवला मदत करत आला आहे. 1988 मध्ये राजीव गांधींनी सैन्य पाठवून मौमून अब्दुल गयूम यांचे सरकार वाचवले होते. इतकंच नाही तर 2018 साली जेव्हा या बेटावर पाण्याचं संकट गंभीर झालं तेव्हा भारताने मालदीवला पाणीपुरवठा केला होता.
यामुळेच मोहम्मद नशीद यांनीही गरज पडेल तेव्हा भारताकडे मदतीचे आवाहन केले होते. मालदीवमध्ये आणीबाणी लागल्यानंतर भारताने आपल्या परराष्ट्र धोरणामुळे त्यावेळी तेथे आपले सैन्य पाठवले नसले तरी यामीन यांच्यावर टीका करून आणीबाणी संपवण्याची मागणी केली होती.
मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या देशात मुइझ्झू यांचे सरकार सत्तेवर आले.आपण सत्तेवर येताच चीनचे समर्थक समजल्या जाणाऱ्या मुइझ्झू यांनी सर्वप्रथम भारतीय सैनिकांना आपल्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केली. आता इथूनच या देशांमधील संबंध बिघडू लागले. मोहम्मद मुइझ्झू हे चीन समर्थक नेते आहेत ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.
मालदीवने चीनला एक बेटही भाडेतत्त्वावर दिले आहे. चीनचे येथे अस्तित्व असेल तर ती आपल्यासाठी धोक्याची बाब आहे असे भारताला वाटते. त्याचवेळी आता भारतीय लष्कराची उपस्थितीही या ठिकाणी नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतासाठी ही दुहेरी चिंतेची बाब आहे.
Web Title: India will attack on maldives tourism maldivian economy in crisis due to boycott of indian tourists know what statistics are saying nryb