
आजकाल रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि त्यासोबतच लोकांच्या मनातील धावपळ आणि ताणतणावही वाढला आहे. अशा वेळी रस्त्यावर एखाद्या वाहनाने कट मारला, विनाकारण हॉर्न वाजवला किंवा ट्रॅफिक जाम झाले, की अनेक चालकांचा संयम सुटतो. यातूनच ‘रोड रेज’ म्हणजेच रस्त्यावरील भांडणे, वाद आणि हाणामारीचे प्रकार घडतात.
हा राग केवळ इतरांसाठीच नाही, तर स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठीही घातक आहे. वाहन चालवताना स्वतःला शांत कसे ठेवावे आणि ‘रोड रेज’ कसा टाळावा, यासाठीच्या काही अत्यंत प्रभावी टिप्स याप्रमाणे आहेत,
१. प्रवासाचे नियोजन वेळेआधी करा
रस्त्यावरील रागाचे मुख्य कारण म्हणजे ‘उशीर होणे’. जेव्हा आपल्याला कुठेतरी पोहोचण्याची घाई असते, तेव्हा समोरचे संथ वाहन किंवा ट्रॅफिक पाहून जास्त संताप येतो. यासाठी नेहमी ठरलेल्या वेळेच्या १० ते १५ मिनिटे आधी घरातून बाहेर पडा. हातात पुरेसा वेळ असेल, तर रस्त्यावरील अडचणींमुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडणार नाही.
Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल
२. ‘समोरचा चुकीचा असू शकतो’ हे स्वीकारा
रस्त्यावर प्रत्येक जण उत्तम चालक असेलच असे नाही. एखादा नवीन शिकणारा चालक असू शकतो किंवा कोणाचे लक्ष विचलित झालेले असू शकते. अशा वेळी समोरच्याने चूक केल्यास लगेच चिडण्याऐवजी “असे प्रकार रस्त्यावर होणारच” हे आधीच मनाशी पक्के करा. समोरच्याच्या चुकीवर ताबा मिळवण्यापेक्षा स्वतःच्या रागावर ताबा मिळवणे जास्त सोपे आहे.
३. शांत संगीत आणि दीर्घ श्वास
गाडी चालवताना मनात नकारात्मक विचार किंवा राग येत असेल, तर गाडीमध्ये शांत, सुमधुर गाणी किंवा एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट लावा. तीव्र आणि वेगवान संगीत ऐकल्याने देखील नकळत चिडचिड वाढू शकते. जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकाल, तेव्हा ३-४ वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यामुळे शरीरातील ताण त्वरित कमी होतो.
४. वाद घालणे किंवा चुकीचे इशारे करणे टाळा
जर एखाद्याने तुमच्या गाडीला ओव्हरटेक करताना कट मारला, तर त्याचा पाठलाग करणे, त्याला खिडकीतून ओरडणे किंवा अश्लील इशारे करणे पूर्णपणे टाळा. यामुळे समोरचा व्यक्ती अधिक हिंसक होऊ शकतो. तुमच्या स्वाभिमानापेक्षा तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.
शहरातल्या ट्राफिकसाठी कोणत्या कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट? वाचा हे 5 पर्याय
५. क्षमा करण्याची वृत्ती ठेवा
रस्त्यावर प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. जर एखाद्याने चुकून तुमच्या गाडीला हलकी कट मारली आणि त्याने हात दाखवून माफी मागितली, तर विषय तिथेच सोडून द्या. ‘असेल घाईत’ असे म्हणून मनाला शांत करा आणि पुढे निघून जा.
६. स्वतःच्या गाडीतच राहा, सुरक्षिततेला प्राधान्य द्या
जर रस्त्यावर कोणी तुमच्याशी मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर गाडीतून खाली उतरू नका. गाडीच्या काचा बंद करा, दरवाजे लॉक करा आणि तिथून सुरक्षितपणे निघून जाण्याचा प्रयत्न करा. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल, तर थेट पोलिसांशी संपर्क साधा.
थोडक्यात सांगायचे तर रस्त्यावरील वाद हे काही सेकंदांचे असतात, परंतु त्यांचे परिणाम कोर्ट-कचेरी, पोलीस स्टेशन किंवा रुग्णालयापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे “लवकर पोहोचण्यापेक्षा, सुरक्षित पोहोचणे महत्त्वाचे” हा विचार मनात ठेवून नेहमी शांत डोक्याने गाडी चालवा.