
जिल्ह्यातील खरीप हंगामात धान व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना घडणाऱ्या अपघातांमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फवारणीच्या विषबाधेमुळे मागील दोन वर्षांत जिल्ह्यात एकही मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली नसली, तरी चालू हंगामात २ ऑगस्ट रोजी दोन शेतकऱ्यांना फवारणीमुळे विषबाधा झाल्याची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व मजुरांनी सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
भात व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणीचे काम सुरू असताना किंवा त्यादरम्यान तंबाखू, खर्रा खाणे मजूर व शेतकऱ्यांसाठी अत्यंत जीवघेणे ठरू शकते. तोंडावाटे निकोटीन व विषारी द्रव्ये शरीरात सहज प्रवेश करत असल्याने कीटकनाशकांचे विष अधिक वेगाने पसरते आणि विषबाधेची शक्यता कैक पटीने वाढते.
फवारणी करताना अनेक शेतकरी व मजूर सुरक्षिततेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तोंडाला मास्क न लावणे, उघड्या अंगाने फवारणी करणे, हवेच्या दिशेविरुद्ध फवारणी करणे यामुळे विषारी घटक श्वासावाटे आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. तसेच फवारणीदरम्यान खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि योग्य खबरदारी न घेतल्यामुळे विषबाधेचा धोका बहुतांश पटीने वाढतो. विषबाधा झाल्यानंतर प्राथमिक उपचारास होणारा उशीर जीवघेणा ठरू शकतो.
मजुरांच्या उपचाराकडे दुर्लक्ष व प्रथमोपचार; अनेकदा शेतमजुरांना विषबाधेची प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे विष संपूर्ण शरीरात पसरून परिस्थिती गंभीर बनते. त्यामुळे फवारणी करताना शेतात प्रथमोपचाराचे साहित्य सोबत ठेवणे आणि मजुरांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेणे अनिवार्य आहे.
फवारणी करताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. फवारणीच्या वेळी कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्याकीय उपचार घेणे गरजेचे असून, उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास प्राणहानी होऊ शकते.
विषबाधेमुळे जर एखादी अनुचित घटना घडल्यास, अशा पीडित शेतकरी अथवा शेतमजुरांच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची व अनुदानाची प्रक्रिया अत्यंत किचकट असते. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आणि फवारणी करताना पूर्ण काळजी घेणे प्रत्येक शेतकऱ्याच्या हिताचे आहे.