
एप्रिलमध्ये वाहन विक्रीत झाली वाढ; GST कपातीनंतर ग्राहकांना होतोय फायदा...
नवी दिल्ली : भारतीय वाहन बाजारपेठेत एप्रिल महिन्यात वाहन विक्री मोठ्या प्रमाणात झाली. जीएसटी दरातील कपात आणि ग्राहकांचा वाढलेला आत्मविश्वास यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल २०२६ मध्ये प्रमुख वाहन कंपन्यांनी विक्रीचे सकारात्मक आकडे जाहीर केले असून, हे आर्थिक वर्ष ऑटो सेक्टरसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल, असे संकेत मिळत आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एम अँड एम) ची एकूण वाहन विक्री एप्रिलमध्ये वार्षिक तुलनेत १४ टक्क्यांनी वाढून ९४६२७ युनिट्सवर पोहोचली. वाहन उत्पादक कंपनीने शुक्रवारी शेअर बाजारांना माहिती दिली की, गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री आठ टक्क्यांनी वाढून ५६३३१ युनिट्सवर पोहोचली, जी एप्रिल २०२५ मध्ये ५२३३० युनिट्स होती. देशांतर्गत बाजारात व्यावसायिक वाहनांची विक्री २३४२७ युनिट्स नोंदवली गेली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ऑटोमोटिव्ह विभाग) नलिनीकांत गोल्लागंटा म्हणाले की, कंपनीने एप्रिलमध्ये आर्थिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात सकारात्मकतेने केली आहे. एप्रिल २०२५ मधील ४००५४ युनिट्सच्या तुलनेत एप्रिलमध्ये ट्रॅक्टरची विक्री २१ टक्क्यांनी वाढून ४८४११ युनिट्सवर पोहोचली.
गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३८५१६ युनिट्सच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्री २० टक्क्यांनी वाढून ४६४०४ युनिट्सवर पोहोचली. एम अँड एमच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष विजय नकरा म्हणाले, एप्रिल २०२५ मधील १,५३८ युनिट्सच्या तुलनेत एप्रिलमध्ये ट्रॅक्टरची निर्यात ३० टक्क्यांनी वाढून २,००७ युनिट्सवर पोहोचली.
दरम्यान, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडने शुक्रवारी अहवाल दिला की, एप्रिल २०२६ मधील त्यांची एकूण विक्री गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ४५५३२ युनिट्सच्या तुलनेत ३१.१२ टक्क्यांनी वाढून ५९,७०१ युनिट्सवर पोहोचली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री एप्रिलमध्ये ३०.५ टक्क्यांनी वाढून ५९००० युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षी याच महिन्यात ४५१९९ युनिट्स होती.
JSW MG ची घाऊक विक्री वाढली
जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची घाऊक विक्री एप्रिलमध्ये वार्षिक तुलनेत ३ टक्क्यांनी वाढून ६०१८ युनिट्सवर पोहोचली. वाहन उत्पादक कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले की, तिच्या अंतर्गत ज्वलन इंजिन (आयसीई) आणि नवीन ऊर्जा वाहन (एनईव्ही) हे दोन्ही विभाग स्थिर गतीने कार्यरत राहिले. पश्चिम आशियातील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला.