
टायरचा रंग नेहमी काळाच का असतो?
ऑटोमोबाईल क्षेत्र एवढे मोठे आहे. लक्झरी कार असो, बजेट बाईक असो की सायकल—गाडीचा रंग कोणताही असला, तरी तिच्या टायरचा रंग मात्र नेहमी काळाच असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की निसर्गातून मिळणारे मूळ रबर हे काळ्या रंगाचे नसून पांढऱ्या किंवा हलक्या पिवळसर रंगाचे असते? मग असे असताना जगातील सर्वच टायर्स काळे का बनवले जातात? यामागे फॅशन किंवा स्टाईल नसून एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक आणि तांत्रिक कारण दडलेले आहे.
‘कार्बन ब्लॅक‘चा अफलातून वापर
सुरुवातीच्या काळात अंदाजे १०० वर्षांपूर्वी गाड्यांचे टायर हे रबराच्या नैसर्गिक रंगामुळे पांढरेच असायचे. परंतु, हे नैसर्गिक रबर खूप मऊ असायचे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे ते लवकर वितळायचे, तर थंडीत कडक होऊन त्याला तडे जायचे. अवघ्या ४ ते ५ हजार किलोमीटर प्रवासातच हे टायर पूर्णपणे झिजून खराब व्हायचे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १९१७ च्या सुमारास टायर बनवताना रबरामध्ये ‘कार्बन ब्लॅक’ नावाचा रासायनिक पदार्थ मिसळण्यास सुरुवात झाली. हा कार्बन ब्लॅक म्हणजेच एक प्रकारची अतिसूक्ष्म काजळी असते, ज्याचा रंग गडद काळा असतो. जेव्हा हा पदार्थ रबरामध्ये मिसळला जातो, तेव्हा रबराचा रासायनिक गुणधर्म पूर्णपणे बदलतो आणि पांढरे रबर काळेभोर होते.
काळ्या रंगाचे टायर का टिकतात?
टायरमध्ये कार्बन ब्लॅक मिसळल्यामुळे गाडीला खालील प्रमुख फायदे मिळतात-
प्रचंड मजबुती: कार्बन ब्लॅक रबराच्या रेणूंना घट्ट पकडून ठेवतो. यामुळे टायरची ताकद आणि मजबुती तब्बल १२ पटीने वाढते. जे पांढरे टायर ५ हजार किलोमीटर चालत असत, तेच काळे टायर आता ४० ते ५० हजार किलोमीटरपर्यंत सहज चालतात.
कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?
उष्णतेपासून संरक्षण: गाडी चालताना रस्ता आणि टायर यांच्यातील घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. कार्बन ब्लॅक हा उष्णतेचा उत्तम वाहक आहे. तो टायरमधील उष्णता शोषून ती हवेत सोडून देतो, ज्यामुळे टायर फुटण्याचा धोका टळतो.
अतिनील किरणांपासून बचाव: सूर्याच्या घातक अतिनील किरणांमुळे रबर कडक होऊन त्याला तडे जातात. कार्बन ब्लॅक या किरणांना शोषून घेतो आणि टायरचे आयुष्य वाढवतो. टायरचा काळा रंग हा केवळ एक रंग नसून गाड्यांच्या सुरक्षिततेचे आणि दीर्घायुष्याचे मजबूत कवच आहे.