
8th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!
Government Employees News: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. पगारात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि किमान वेतन किती मिळेल, याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू केवळ महागाई भत्ता किंवा वेतनवाढ नाही, तर पगार ठरवण्याची पद्धत बदलण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ठरवताना एका ठरावीक कुटुंबाचा विचार केला जात होता. पण आता या पद्धतीत बदल करण्याची मागणी पुढे आली आहे. नव्या प्रस्तावानुसार कर्मचाऱ्याच्या कुटुंबात फक्त पती-पत्नी आणि मुलं नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांचाही विचार व्हावा, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी मांडली होती.
सध्याच्या व्यवस्थेत वेतन निश्चित करताना तीन सदस्यांच्या कुटुंबाचा आधार घेतला जातो. या गणनेवरूनच किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टर ठरवला जातो. पण आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीत अनेक कर्मचारी आपल्या वृद्ध पालकांची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यामुळे पगाराचे गणित वास्तवाशी जुळावे, यासाठी कुटुंबाची व्याख्या मोठी करण्याची मागणी वाढत आहे. या प्रस्तावानुसार कुटुंबातील सदस्यांची संख्या पाच मानली जाऊ शकते. यामध्ये कर्मचारी , त्यांची पत्नी किंवा पती , मुलं आणि आई-वडील यांचा समावेश असेल. जर हा प्रस्ताव मान्य झाला, तर किमान वेतन ठरवताना आवश्यक खर्चाचे गणितही बदलणार आहे. अन्न, निवास, शिक्षण, आरोग्य, कपडे आणि इतर दैनंदिन गरजांचा खर्च अधिक व्यापक पद्धतीने मोजला जाईल. (8th Pay Commission News:)
याच बदलाचा परिणाम फिटमेंट फॅक्टरवरही होऊ शकतो. आतापर्यंत वापरल्या गेलेल्या गुणोत्तरापेक्षा अधिक फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही अंदाजानुसार हा आकडा 3.83 पर्यंत जाऊ शकतो. तसे झाल्यास सध्या मिळणाऱ्या किमान मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर सुविधा वेगळ्या मिळतील.
Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? Google चे ‘हे’ 5 Apps कारणीभूत
मात्र, हे सर्व अद्याप प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे. सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले आकडे निश्चित मानता येणार नाहीत. अंतिम निर्णय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होईल.
कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, आजच्या काळात वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे त्यांच्या खर्चाचाही विचार वेतन ठरवताना होणे आवश्यक आहे. काही कायद्यांमध्येही पालकांच्या देखभालीची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीला कायदेशीर आणि सामाजिक आधार असल्याचे संघटनांचे मत आहे.
दुसरीकडे, आर्थिक तज्ज्ञांचे मत थोडे सावध आहे. त्यांच्या मते, वेतनात मोठी वाढ झाल्यास सरकारवर आर्थिक भार वाढू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारी तिजोरी यांचा समतोल राखून निर्णय घेतला जाऊ शकतो.
एकूणच, 8व्या वेतन आयोगात यावेळी केवळ पगारवाढीची चर्चा नाही, तर कुटुंबाच्या बदलत्या स्वरूपाचा विचार करून वेतन निश्चित करण्याची नवी दिशा समोर येत आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या उत्पन्नात लक्षणीय बदल होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष वेतन आयोगाच्या अंतिम शिफारशी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.