...तुम्हाला माहितीये का? अर्थसंकल्प सकाळी 11 ऐवजी सायंकाळी 5 वाजता सादर व्हायचा! 'या'मुळे बदलली वेळ!
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर, आता तिसरा कार्यकाळातील आपला पहिला अर्थसंकल्प भाजप सरकारकडून २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सादर केला जाणार आहे. मात्र, आता आपल्यापैकी अनेक जणांना माहिती नसेल की, यापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. अर्थसंकल्प सादर करण्याची वेळच नाही तर त्याची तारीखही बदलण्यात आली आहे.
काय होती स्वातंत्र्यापूर्वीपासूनची वेळ?
स्वातंत्र्यापूर्वी भारतात इंग्रज काळात भारतात केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी संध्याकाळी 5 वाजता सादर होत असे. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ही परंपरा अनेक वर्षे सुरूच होती. ज्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर केला जात असे. सायंकाळी ५ वाजताची वेळ निश्चित करण्यामागे इंग्लंड कनेक्शन होते. आता तुम्हीही विचारात पडला असाल की, संध्याकाळी ५ वाजताचीच वेळ का इंग्रजांनी निश्चित केली.
‘हे’ आहे कारण?
तर युरोपियन देशांच्या विशेषतः इंग्लंडच्या वेळेनुसार सायंकाळी 5 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. इंग्लंड आणि भारताच्या वेळेत 5.5 तासांचा फरक आहे. भारतात संध्याकाळ झाली की ब्रिटनमध्ये दिवसाचे काम सुरू होते. आपली सोय लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने भारतात अर्थसंकल्पाची वेळ संध्याकाळी 5 वाजता निश्चित केली होती.
एनडीए सरकारने बदलली प्रथा
एनडीए सरकारने 1999 मध्ये संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा संपवली. तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते आणि यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते. यशवंत सिन्हा यांनी 27 फेब्रुवारी 1999 रोजी सकाळी 11 वाजता भारतात पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून दरवर्षी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जातो. अशाप्रकारे दररोज 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रक्रिया गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे.
‘विश्लेषणासाठी वेळ मिळावा’
केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी 5 ऐवजी सकाळी 11 वाजता सादर केल्यास त्याच्या विश्लेषणासाठी अधिक वेळ मिळेल, असे त्यांनी सुचवले. यामुळे संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेची पातळीही सुधारेल. कारण खासदारांना अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती असेल. असे कारण देण्यात आले. दरम्यान अलीकडच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलण्यात आली. वर्ष 2017 पूर्वी दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखेला अर्थसंकल्प सादर केला जात होता. अरुण जेटली 2017 मध्ये अर्थमंत्री होते. अर्थसंकल्प 2017 पासून शेवटच्या तारखेऐवजी 1 फेब्रुवारीला सादर केला जात आहे.