
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
महागाईचा दणका आता अंड्यांपर्यंत पोहोचला आहे. अंड्यांच्या किमती वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कोंबड्यांच्या खाद्याचा वाढता खर्च. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचबरोबर, देशात इथेनॉल उत्पादनासाठी मक्याची मागणीही वाढली आहे. यामुळे कुक्कुटपालन उद्योगासाठी मका महाग झाला आहे. कुक्कुटपालनाच्या एकूण खर्चापैकी अंदाजे ६५-७० टक्के खर्च मक्यावर होतो. त्यामुळे त्याचा मक्याच्या किमतीतील वाढीचा थेट परिणाम अंडी आणि कोंबडीच्या किमतींवर होतो.
मक्याची वाढलेली किंमत हे एकमेव कारण नाही. तर या वर्षीचं हवामानही या सगळ्याला तितकंच कारणीभूत आहे. या वर्षीच्या तीव्र उष्णतेचा आणि हवामानातील बदलांचा कोंबडी उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. तीव्र उष्णतेमुळे कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते आणि काही ठिकाणी तर कोंबड्यांचा मृत्यूही होतो. यामुळे बाजारात पोहोचणाऱ्या अंड्यांची संख्या कमी होते, ज्यामुळे किमतींवर दबाव येतो. तुलनेने अंड्यांच्या किमती वाढतात.
कोंबडीच्या किमती वाढण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. कारण मका आणि सोयाबीनसारख्या धान्यांच्या वाढत्या किमतींमुळे कोंबड्या पाळण्याचा खर्च देखील वाढला आहे. खाद्याच्या किमतीतील वाढीचा परिणाम अंडी आणि कोंबडी या दोन्हींच्या किमतींवर होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की श्रावण संपताच कोंबडीच्या किमती वाढतील. कोंबडीच्या किमती किती वाढतील हे पूर्णपणे मागणी, पुरवठा, उत्पादन आणि स्थानिक बाजारपेठेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे महागाईचा दणका वाढत असला तरीही यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत आहेत.