(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
भारत केवळ स्वतःची ऊर्जेची गरज भागवत नाही, तर आपल्या शेजारील देशांना वीज पुरवून मोठी परदेशी चलनाची कमाई देखील करत आहे. नेपाळ, बांगलादेश, भूतान आणि म्यानमार यांसारख्या देशांना भारत मोठ्या प्रमाणावर विजेची निर्यात करतो. भारतातील अदानी पॉवरसह अनेक प्रमुख भारतीय कंपन्या बांगलादेशला मोठ्या प्रमाणात वीज विकतात. पण वेळेवर बिले भरण्यास असमर्थ असल्यामुळे, झारखंडमधील गोड्डा येथील त्यांच्या प्रकल्पातून बांगलादेशला होणारा वीजपुरवठा कमी झाला आहे. बांगलादेशच्या मर्यादित परकीय चलन साठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून कोळसा आणि गॅस आयात करणे देखील कठीण होत आहे. या संदर्भात, भारत कोणत्या देशांना वीजपुरवठा करतो हे जाणून घेऊया.
भारत आपली बहुतेक वीज बांगलादेशला विकतो. बांगलादेश हा भारतीय विजेचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. बांगलादेशकडून त्याबदल्यात दरवर्षी १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमत भारताला मिळते.
नेपाळ – नेपाळ आणि भारत यांच्यात विजेचा दुतर्फा व्यापार चालतो. हिवाळ्यात, जेव्हा नेपाळमध्ये पाण्याची कमतरता असते आणि जलविद्युत उत्पादन घटते, तेव्हा भारत नेपाळला वीज विकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा मान्सूनमध्ये उत्पादन वाढते, तेव्हा नेपाळ भारताला वीज परत विकतो.
भूतान – भारत हिवाळ्यातील विजेची कमतरता भागवण्यासाठी भूतानला वीज विकतो, तर इतर दिवशी भूतानकडून जलविद्युत आयात करतो. भूतानमधील नद्यांच्या जास्त प्रवाहामुळे, मे ते नोव्हेंबर दरम्यान जलविद्युत उत्पादन प्रचंड होते. या काळात, भूतान अतिरिक्त वीज भारताला विकून महसूल मिळवतो.
म्यानमार – भारत सीमावर्ती भागातील ग्रीड कनेक्टिव्हिटीद्वारे म्यानमारलाही मर्यादित प्रमाणात वीज विकतो.
समुद्राखालून पारेषण वाहिन्या टाकण्यासाठी आणि वीज व्यापाराचा विस्तार करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात उच्चस्तरीय आढावा बैठका सुरू आहेत. ऊर्जा सुरक्षा आणि नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देश संपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचाही आढावा घेत आहेत.

