रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देणार - उद्योगमंत्री
रायगड जिल्ह्यात 83 हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध 50 हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टला मंजुरी मिळाली आहे. यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण करेल. असे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने उलवे, पनवेल येथे आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर
यावेळी व्यासपीठावर खा. सुनील तटकरे आ महेश बालदी, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सह संचालक विजू सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या आदी उपस्थित होते. गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह
राज्य शासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे. या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गारही सामंत यांनी यावेळी काढले आहे.
राज्याच्या उद्योग विभागाची उत्तुंग भरारी
राज्याच्या उद्योग विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे, यासाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून खा. सुनील तटकरे म्हणाले की, गडचिरोली सारख्या भागात देखील औद्योगिक विकास होतो आहे. रोजगार निर्मिती होत आहे ही जमेची बाजू आहे. राज्यात गुंतवणूक, रोजगार निर्मिती झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तारते आहे. सिडकोमुळे नवी मुंबई आणि परिसराचा विकास होतो आहे. अटल सेतूमुळे मुंबईशी जवळीक वाढली आहे. राज्यात सर्वांकष औद्योगिक विकास होतो आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
35 हजार जणांना रोजगार
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे 35 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून, उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचेही ते म्हणाले आहे. यावेळी आमदार महेश बालदी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, यांची भाषणे झाली. यावेळी उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध लाभांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या यांनी केले. विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






