
(फोटो सौजन्य: Chatgpt)
लिंक्डइन प्लॅटफॉर्म डेटानुसार, भारतातील सी-सूट प्रमुखांमधील केवळ एकाच उद्योगाचा अनुभव असण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्क्यांवरून ५८ टक्क्यांवर घसरले आहे. ज्यामधून निदर्शनास येते की, आता नेतृत्व बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्या, कार्यक्षेत्रे आणि व्यावसायिक परिस्थितींचा अनुभव असण्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. लिंक्डइनच्या नवीन संशोधनात दिसून आले आहे की, एआय या बदलाचा वेग अधिक वाढवत आहे. भारतातील ८४ टक्के सी-सूट प्रमुखांचे म्हणणे आहे की, एआय त्यांच्या संस्थेत नवीन भूमिका निर्माण करत आहे आणि ही भावना सीएमओंमध्ये सर्वात जास्त (९४ टक्के) पाहायला मिळत आहे. प्रमुख आता निर्णय प्रक्रियेत एआयचा अधिकवापर करत आहेत. तसेच ८४ टक्के प्रमुखांच्या मते, एआय टूल्सकडून मिळणारे इनपुट आता महत्त्वाचा टप्पा बनले आहेत.
लिंक्डइनचे इंडिया कंट्री मॅनेजर आणि व्हीपी एलएसएस प्रॉडक्ट कुमारेश पट्टाभिरामन (Kumaresh Pattabiraman, India Country Manager and VP LSS Product, LinkedIn) म्हणाले, “भारतातील सी-सूट आता नेतृत्वाच्या अधिक आव्हानात्मक आणि मागणी असलेल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. एआयमुळे जुन्या नियमावलींचे महत्त्व वेगाने कमी होत आहे, याचा अर्थ असा की, प्रमुखांना कोणत्याही स्पष्ट रोडमॅपशिवाय या बदलाला सामोरे जावे लागेल, वेगवान निर्णय घ्यावे लागतील आणि नव्या पुराव्यांचा स्वीकार करत यशाचे मोजमाप करावे लागेल. जे प्रमुख आपल्या निर्णयक्षमतेला अधिक अचूक बनवण्यासाठी एआयचा वापर करतील, तंत्रज्ञान, टॅलेंट आणि बिझनेस टीम्सना सुरुवातीपासून चर्चेत सामील करून घेतील आणि क्षमतेमधील त्रुटींचे व्यवसायातील त्रुटींमध्ये रूपांतर होण्याआधीच त्या शोधून काढतील, तेच सर्वात खंबीर प्रमुख म्हणून पुढे येतील. खरा फायदा त्या प्रमुखांना मिळेल, जे बाजारपेठ जितक्या वेगाने बदलत आहे तितक्याच वेगाने सतत शिकत राहतील.”
भारतातील जवळपास ५ पैकी ४ सी-सूट प्रमुख म्हणतात की, एआयच्या प्रभावाचे प्रभावीपणे मोजमाप करण्यापूर्वी एआयचे वेगवान अवलंब करण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव आहे. हा दबाव सीएमओ (८२ टक्के) आणि’सीटीओ (८१ टक्के) यांच्यामध्ये सर्वाधिक आहे, जे एआय कशा प्रकारे ग्राहक सहभाग आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या पद्धती वेगाने बदलत आहे, हे दर्शवते. तसेच, भारतातील ३९ टक्के सी-सूट प्रमुखांनी सततच्या अनिश्चिततेमध्ये वेगाने निर्णय घेण्याला आपले सर्वात मोठे आव्हान मानले आहे, विशेषतः सीएमओ (४६ टक्के) आणि सीईओ (४३ टक्के) यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. यावरून स्पष्ट होते की, सध्याच्या नेतृत्वाची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे अनिश्चिततेतही वेगाने अचूक निर्णय घेणे आहे.
एआयमुळे नोकरीच्या भूमिका आणि क्षमता बदलत असताना, भारतातील ५१ टक्के सी-सूट प्रमुखांनी मान्य केले आहे की, त्यांच्या संस्थेला भविष्यात कोणत्या प्रकारच्या भूमिका, कौशल्ये आणि क्षमतांची गरज भासेल, याबद्दल त्यांच्याकडे स्पष्टता नाही. ही समस्या सीएमओंमध्ये सर्वाधिक ५८ टक्के इतकी दिसून आली आहे. या डेटामधून निदर्शनास येते की, वर्कफोर्स प्लॅनिंग (कर्मचारीवर्गाचे नियोजन) आता केवळ एचआरचे काम राहिलेले नाही. हे आता एका सामायिक नेतृत्वाचे आव्हान बनत चालले आहे, ज्याचा प्रत्यक्ष संबंध व्यवसायाची वाढ, तंत्रज्ञानाचा अवलंब, ग्राहक धोरण आणि संस्थात्मक रचनेशी आहे.
भारतातील जवळपास १० पैकी ९ सी-सूट प्रमुख म्हणतात की, त्यांच्या संस्थेने एआयमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा नाविन्यता हाच सर्वात महत्त्वाचा परिणाम आहे. ही अपेक्षा सीएओंमध्ये सर्वाधिक ९२ टक्के आहे, त्यापाठोपाठ सीईओ आणि सीटीओ यांच्यामध्ये प्रत्येकी ९१ टक्के आणि सीएचआरओंमध्ये ८२ टक्के आहे. एआय व्यावसायिक कामकाजात अधिक खोलवर रुजत आहे, तसे प्रमुख उत्पादकतेच्या पलीकडे पाहत आहेत. हे तंत्रज्ञान संस्थांना नवीन उत्पादने तयार करण्यात, ग्राहकांचा अनुभव सुधारण्यात, कामाच्या नवीन पद्धती शोधण्यात आणि बाजारपेठेत अधिक प्रबळ स्पर्धात्मक फायदा मिळवण्यात मदत करू शकते, यावर ते लक्ष केंद्रित करत आहेत.
नेतृत्वाच्या भूमिका बदलत आहेत, तसतशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असणारी कौशल्ये देखील बदलत आहेत. भारतातील सी-सूटमध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या पहिल्या पाच कौशल्यांपैकी चार कौशल्ये एआयशी संबंधित आहेत, ज्यामध्ये ‘आय एजंट्स, एआय प्रॉडक्टिव्हिटी, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन आणि एआय स्ट्रॅटेजी यांचा समावेश आहे. भारतात सी-सूटमध्ये एआय एजंट्स सर्वात वेगाने वाढणारे कौशल्य ठरले आहे, यात वार्षिक साधारण १८.६ टक्के वाढ झाली आहे. एआय आणि टेक्निकल कौशल्यांशी संबंधित विशेष कौशल्ये देखील २०२० पासून १०.९ टक्क्यांनी वाढली आहेत. यामधून निदर्शनास येते की, व्यवसाय धोरणामध्ये एआय मुख्य प्रवाहात येत आहे, तसे वरिष्ठ प्रमुखांच्या गरजेमध्ये मोठी आणि अचूक सुधारणा होत आहे.