
N. Chandrasekaran Success Story: टाटांकडे इंटर्न म्हणून आला अन् आयुष्यच बदललं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Businessman Success Story: मोठ्या कंपनीचा प्रमुख होणे ही एक गोष्ट आहे, पण एका छोट्या गावातून सुरुवात करून देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगसमूहाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचणे ही वेगळीच कहाणी आहे. एन. चंद्रशेखरन यांचा प्रवास याचं उत्तम उदाहरण मानला जातो. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या चंद्रशेखरन यांनी मेहनत, तंत्रज्ञानाची जाण आणि शांत नेतृत्वाच्या जोरावर टाटा समूहात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
तामिळनाडूतील नामक्कलजवळच्या मोहनूर या छोट्या गावात 1963 मध्ये त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरणात बालपण गेलं. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगणक क्षेत्राची वाट निवडली. सुरुवातीला टाटा समूहातील टीसीएसमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हीच छोटी सुरुवात पुढे त्यांच्या तब्बल चार दशकांच्या कारकिर्दीचा पाया ठरली.
1987 मध्ये ते टीसीएसमध्ये पूर्णवेळ कर्मचारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कंपनीतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःची क्षमता सिद्ध केली. भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटन आणि स्वीडनमध्येही त्यांनी टाटा समूहासाठी काम केलं. परदेशातील अनुभवामुळे त्यांना जागतिक बाजारपेठ, ग्राहकांची बदलती गरज आणि तंत्रज्ञानातील वेगवान बदल समजून घेण्याची संधी मिळाली.
चंद्रशेखरन यांच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा 2009 मध्ये आला. त्यांची टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. पुढील काही वर्षांत त्यांनी कंपनीला अधिक वेगाने पुढे नेलं. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएसने आंतरराष्ट्रीय बाजारात आपली पकड मजबूत केली आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये आपलं स्थान आणखी भक्कम केलं.
याच काळात त्यांच्या कामाची दखल टाटा समूहाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतली. रतन टाटा यांच्यासह समूहातील अनेकांना चंद्रशेखरन यांची कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता पसंत पडली. N. Chandrasekaran Success Story:
रतन टाटांसह वरिष्ठ नेतृत्वाची पसंती
2016 मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळात स्थान मिळालं. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. 2017 मध्ये त्यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या पदावर पोहोचणारे ते पहिले बिगर-पारशी अध्यक्ष ठरले.
त्यांचा कार्यकाळ मात्र नेहमीच सोपा राहिला नाही. टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. या प्रकरणामुळे समूहासमोर मोठं आव्हान निर्माण झालं. चंद्रशेखरन यांनी या काळात नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या नियुक्तीवरील वादाला पूर्णविराम मिळाला.
शैक्षणिकदृष्ट्याही त्यांचा प्रवास मजबूत होता. त्यांनी कोयंबतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून उपयोजित विज्ञान विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्रिची येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक अनुप्रयोगातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या काळात समूहाने पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे पाहण्यास सुरुवात केली. विमानसेवा, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, डिजिटल सेवा आणि नव्या तंत्रज्ञानातील संधींवर अधिक लक्ष देण्यात आलं. टाटा समूहाला भविष्यातील उद्योगांमध्येही मजबूत उपस्थिती मिळावी, यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.
आता चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचा सध्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 पर्यंत आहे. त्यामुळे त्यांचा टाटा समूहाशी असलेला प्रवास अजून काही काळ सुरू राहणार आहे.
एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास केवळ मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याची गोष्ट नाही. बदलत्या काळासोबत स्वतःला बदलत राहिलं, तर संधी कुठूनही मिळू शकते, हे चंद्रशेखरन यांच्या कारकिर्दीतून दिसून येतं. जवळपास 40 वर्षे एकाच समूहासाठी काम करून त्यांनी टाटा नावाच्या मोठ्या वारशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
From Worker to Contractor: मजुरापासून कंत्राटदारापर्यंत; सुनील अडे यांच्या मेहनतीची यशोगाथा