
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
भारतातील या क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड असलेल्या Bisleri ने आताच आपल्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ केली आहे; त्यामुळे आता एक-लिटरच्या बारा बाटल्या असलेल्या एका कार्टनची किंमत २४ रुपयांनी वाढली आहे. Bailley आणि Clear Premium Water यांसारख्या इतर ब्रँड्सनीही आपल्या किमती वाढवल्या आहेत.
Bisleri चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO अँजेलो जॉर्ज यांनी ‘रॉयटर्स’ला सांगताना स्पष्ट केलं की, “पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किंमत २० रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे. केवळ गेल्या पंधरवड्यातच, पॅकेजिंग साहित्याच्या किमतीत ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली त्यामुळे त्याचा परिणाम किमतीवर दिसून येत आहे.”
इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची किंमत वाढत आहे; याचे कारण म्हणजे पाणी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘PET’ बाटल्या या कच्च्या तेलापासून मिळणाऱ्या पॉलिमरपासून बनवल्या जातात. युद्धामुळे, पॉलिमरच्या किमतीत अंदाजे ५० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे प्लास्टिक ग्रॅन्युल्सची किंमत ११५ रुपये प्रति किलोवरून १८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. एका वृतसंस्थेच्या अहवालात ‘केमको प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि.’चे संचालक वैभव सराओगी यांचे विधानाने सांगितलं जात आहे की , “PET प्रीफॉर्म्सच्या किमतीतील वाढीचा परिणाम केवळ बाटलीबंद पाणी क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण पॅकेजिंग उद्योगावर होत आहे.” शीतपेये, फ़ूड डिलीवरी, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधने यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये PET पॅकेजिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
एका संस्थेच्या अभ्यासानुसार, शहरी भागातील अंदाजे १५ टक्के आणि ग्रामीण भागातील ६ टक्के कुटुंबे आपल्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बाटलीबंद पाण्यावर अवलंबून असतात. ‘महाराष्ट्र बाटलीबंद पाणी उत्पादक संघटने’चे अध्यक्ष विजय सिंग दुब्बल यांनीही बाटलीबंद पाण्याच्या वाढत्या किमतीचे मुख्य कारण म्हणून कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांकडे निर्देश केला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की, “प्रीफॉर्म्सची किंमत ११५ रुपये प्रति किलोवरून वाढून अंदाजे १८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. शिवाय, प्रीफॉर्म्सच्या पुरवठ्यातही घट झाली आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, राज्यातील बाटल्यांचे उत्पादन करणारे सुमारे २० टक्के कारखाने तात्पुरते बंद पडले आहेत. ही एक चिंतेची बाब आहे; कारण भारतात स्वच्छ पाण्याची उपलब्धता ही आजही एक मोठी आव्हानात्मक समस्या बनलेली आहे. विविध अहवालांनुसार, भूगर्भातील पाण्याचा सुमारे ७० टक्के साठा दूषित झालेला आहे. परिणामी, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील कुटुंबे बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहेत आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाचा परिणाम म्हणून, आता अधिकाधिक महाग होत चालली आहे.