
ban
Engineering Admission Ban 2026: दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आपल्या करिअरची सुरुवात करण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, जर एखाद्या कॉलेजमध्ये अचानक नवीन प्रवेश बंद झाले, तर सर्वात पहिला प्रश्न हाच पडतो की, नक्की असे का झाले आणि तेथे आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल? सध्या अशीच माहिती देशातील इंजिनीअरिंग आणि तांत्रिक शिक्षण क्षेत्रातून समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये देशभरातील ५८ इंजिनीअरिंग आणि तांत्रिक संस्थांमध्ये नवीन प्रवेश घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
परंतु, या कॉलेजांमध्ये आधीपासून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागणार नाही. ते निश्चित कालावधीपर्यंत आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील आणि आपली पदवी पूर्ण करू शकतील. नक्की असे काय घडले की ही कॉलेजेस बंद करण्याची वेळ आली? चला तर मग जाणून घेऊया
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) या संस्थांना ‘प्रोग्रेसिव्ह क्लोजर’ (Progressive Closure) साठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ असा की, संबंधित कॉलेजेस नवीन शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत; मात्र ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आधीच झाले आहेत, त्यांचे वर्ग आणि परीक्षा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. AICTE नुसार, एखाद्या संस्थेला प्रोग्रेसिव्ह क्लोजरची परवानगी मिळण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटणे, आवश्यक संख्येमध्ये पात्र प्राध्यापक (Faculty) उपलब्ध नसणे, पायाभूत सुविधा आणि इतर शैक्षणिक मानके पूर्ण न करणे, कॉलेज चालवण्याशी संबंधित नियम आणि AICTE च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या घटकांचा समावेश आहे.
या कारणांमुळे अनेक संस्थांनी स्वतःहून बंद होण्याचा पर्याय निवडला, तर काही संस्थांना निर्धारित मानकांवर खरे न उतरल्यामुळे नवीन प्रवेशाची परवानगी मिळाली नाही. या ५८ संस्थांपैकी केवळ ३ संस्था सरकारी अनुदानित आहेत, तर उर्वरित सर्व खाजगी संस्था आहेत. ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच 12-12 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
केवळ संस्थाच नव्हे, तर २०२५ ते २०२६ दरम्यान संपूर्ण भारतात ९५० हून अधिक इंजिनीअरिंग आणि तांत्रिक कोर्सेस (अभ्यासक्रम) देखील बंद करण्यात आले आहेत. परंतू, जर एखादा विद्यार्थी अशा कॉलेजमध्ये शिकत असेल ज्याला प्रोग्रेसिव्ह क्लोजरची मंजुरी मिळाली आहे, तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचे शिक्षण नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि तो त्याच संस्थेतून आपला कोर्स पूर्ण करू शकेल. या निर्णयाचा परिणाम केवळ नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर होईल.