
फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना वेगाने राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात एकूण ५४२ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या अंतर्गत विविध तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील १२० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तसेच भिवंडी तालुक्यातील ३०८ शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. अंबरनाथ तालुक्यात ९६ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरित १८ शाळांमधील काम सध्या प्रगतीपथावर आहे. अशा प्रकारे एकूण ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या उपक्रमाला पुढील टप्प्यातही गती देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध निधीतून आणखी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुरबाड गटातील ३२९ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नियोजित वेळेत सुरू असून या सर्व शाळांमधील यंत्रणा मार्च २०२६ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत.
तसेच शहापूर गटातील ४५७ शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून या शाळांमधील सर्व यंत्रणा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरित शाळांमध्येही लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शाळांमधील वातावरण अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होईल.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणे, अनुचित प्रकारांना आळा घालणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.