
कचऱ्यात फेकलेल्या सफरचंदांचा बाजार? एपीएमसीतील धक्कादायक प्रकार; चौकशीच्या मागणीला जोर
नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमधून कचऱ्यात फेकून दिलेली सफरचंदे उचलून ती मुंबई, ठाणे आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये विकली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओही समोर आल्याने ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी
मिळालेल्या माहितीनुसार, फळ मार्केटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलेली सफरचंदे काही व्यक्ती गोळा करून बाहेर नेत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर हीच सफरचंदे विविध बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांनी विकली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.या प्रकाराचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये कचऱ्यातून सफरचंदे उचलणारी व्यक्ती ही फळे मुंबई, ठाणे आणि इतर भागांत विकली जात असल्याचे सांगताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे कचऱ्यातून फळे गोळा करून विकणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे ग्राहकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कचऱ्यातून उचललेली फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असतील, तर त्यांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची तपासणी कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कचऱ्यातून उचललेल्या फळांची विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा प्रकारांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.